17 कि.मी. चालत जावून गाठले घर; महापालिका प्रशासनाची उडाली झोप
निकमार विलगीकरण कक्षातून महापालिका अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन पलायन
पुणे – शहरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच बालेवाडी येथील निकमार विलगीकरण कक्षातून करोना बाधित व्यक्ती महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन पळाला. एवढच नव्हे तर तो तब्बल 17 किलोमीटर चालत येरवडा परिसरात पोहोचला आणि तब्बल 4 ते 5 तास फिरत होता. यावेळी परिसरातील नागरिकांनीच फोन केल्यावर आरोग्य विभागाला जाग आली. यावरून महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा नमुना समोर आला तर आहे. परंतु हा प्रकार सध्याच्या घडीला किती महागात पडू शकतो, याबाबत न बोलणेच योग्य.
बालेवाडी येथील विलगीकरण कक्षात 84 करोनाबाधित रूग्ण उपचार घेत आहेत. याठिकाणी बाधित व्यक्ती बाहेर जावू नये यासाठी डॉक्टर आणि कर्मचारी दिवस-रात्र काम करत असल्याचे महापालिका आरोग्य प्रमुख छातीठोकपणे सांगतात. मात्र, मंगळवारी घडलेल्या प्रकारानंतर पालिकेच्या ढिसाळ कारभाचे चित्र समोर आले. निकमार येथे उपचार घेत असलेली 79 वर्षीय वृद्ध व्यक्ती मंगळवारी रात्री येथील डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारी यांना कोणतीही कल्पना न देता कक्षाच्या बाहेर पडली. यावेळी त्यांना कोणीच पाहिले नाही की अडविले नाही. त्यानंतर ते तब्बल 17 किलोमीटर चालत राहत असलेल्या येरवडा भागात आले.
याबाबत नगरसेवक सिद्धार्थ धेंडे यांनी महापालिकेला कळवल्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास या रुग्णाला पुन्हा विलगीकरण कक्षात घेऊन गेले. याबाबत आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होवू शकला नाही.
व्यक्तीच्या कुटुंबातील काहीजण करोनाबाधित
ही व्यक्ती करोनाबाधित असून महापालिका प्रशासनाने या व्यक्तीला रक्षकनगर विलगीकरण कक्षात 24 एप्रिल रोजी दाखल केले होते. तर 25 एप्रिल रोजी त्याला बालेवाडी येथे हलवले. यामुळे अजून 14 दिवसही पूर्ण झालेले नाही आणि घरामध्ये कोणीच नसल्यामुळे तो बाहेरच बसला. अशा परिस्थितीत ही व्यक्ती इथे कशी या विचाराने परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
दरम्यान, या व्यक्तीच्या संपर्कातील नागरिकांची करोना तपासणी करण्यात आली. या व्यक्तीच्या कुटुंबातील काही व्यक्ती सुद्धा करोनाबाधित आढळल्या आहेत. याठिकाणी हा व्यक्ती आल्यानंतर येथील नागरिकांनी घरे बंद करून घेतली. या भागातील 18 नागरिकांना करोनाची लागण झाली आहे.
शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासनाकडून तपासणीचे प्रमाण वाढवले आहे. ज्या रुग्णांना करोनाची लक्षणे आढळतील अशा रुग्णांची तपासणी करण्यात येते. काही ठिकाणी असे संशयित रुग्ण तपासणी नंतर एकत्र ठेवण्यात येत असल्यामुळे धोका वाढतो.
– डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक