Lok Sabha Election 2024 – राज्यातील लोकसभा निवडणुकीचा पाचवा आणि शेवटचा टप्पा सोमवारी, 20 मे रोजी पार पडणार आहे. या टप्प्यात राज्यातील १३ जागांसह ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ४९ जागांवर मतदान होणार आहे.
यात मुंबईतील सहा लोकसभांसह ठाणे, भिवंडी, पालघर, कल्याण-डोंबिवली, नाशिक, धुळे, दिंडोरीचा समावेश आहे. त्यामुळे आता राज्यातील लोकसभा निवडणुकांची उद्या एक प्रकारे सांगता होणार आहे. यानंतर राज्यातील सर्वांना उत्सुकता असणार आहे ती 4 जूनच्या निकालाची.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अनेक दिग्गज नेतेमंडळी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. गेल्या महिन्याभरात या उमेदवारांनी आपली सर्व ताकद पणाला लावून प्रचार केला.
तर, उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक नेत्यांनी प्रचारसभा जोरदार प्रचारही घेतला. कडाक्याचे ऊन असो किंवा जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस असो, नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मिळून आपापल्या उमेदवाराचा प्रचार करण्यात कोणतीही कमतरता सोडली नाही.
यावेळी नेतेमंडळींकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झाडण्यात आल्या. पण आता हे सर्व काही शांत झाले असून केवळ मतदारांचे मत पेटीत बंद होण्याचे बाकी आहे.
नागपूर आणि पूर्व विदर्भातील मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात सुरू झालेल्या निवडणुकीच्या प्रवासाची सोमवारी मुंबईतील सहा लोकसभा, ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, पालघर आणि उत्तर महाराष्ट्रातील तीन जागांच्या मतदानाने म्हणजेच 13 लोकसभेच्या मतदानाने सांगता होईल.
राज्यात सध्या तरी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळत आहे. पण काही मतदारसंघात एखाद्या अपक्ष उमेदवारामुळे तिहेरी लढतही पाहायला मिळाली आहे.
त्यामुळे निकालाच्या दिवशी म्हणजेच 4 जूनला कोणाचा कोणाची तुतारी वाजणार, कोणाची मशाल पेटणार, कोण पंजा दाखवणार, कोणाचे कमळ फुलणार, कोण धनुष्यबाण मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमीच जिंकेल
देशात उद्या, सोमवारी पाचव्या टप्प्याचे मतदान होणार असून प्रत्येक नागरिकाने मतदान करावे यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक्सवर पोस्ट करत मतदानाचे आवाहन केले आहे. सचिन म्हणतो, एखाद्या सामन्यामध्ये प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमीच जिंकेल असे नाही.
मात्र, लोकशाहीत असेच घडत असते. लोकांनी ज्याला सर्वाधित मतदान केले असते त्याचाच विजय होतो. आपण नागरिक म्हणून आपले सामर्थ्य दाखवूया… चला मतदान करूया, असे आवाहन त्याने केले आहे.
पाचव्या टप्प्यात कोणती राज्ये?
बिहार (5), झारखंड (3), महाराष्ट्र (13), ओडिशा (5), उत्तर प्रदेश (14), पश्चिम बंगाल (7), जम्मू-काश्मीर (1) लडाख (1)