नवी दिल्ली – जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आणि गेटस् न्यासाचे सहाध्यक्ष बिल गेटस् यांनी पंतप्रधान मोदींची प्रशंसा केली आहे. मोदींनी करोनाविरुद्धच्या युद्धात कौतुकास्पद निर्धाराचे दर्शन घडविले. यातून त्यांचे नेतृत्वगुण सिद्ध झाले आहेत. त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने भारताने करोनाचा आलेख स्थिर ठेवण्यात यश मिळविले, असे प्रतिपादन गेटस् यांनी केले. भारताच्या संगणकीय क्षमतेचा आपले सरकार करोनाविरुद्धच्या युद्धात कल्पकतेने उपयोग करत आहे. आरोग्य सेतू हे मोबाइल ऍप याकामी महत्त्वाची भूमिका घेत आहे, असेही गेटस् यांनी पत्रात नमूद केले आहे.
यासंदर्भात नुकतेच गेटस् यांनी एक पत्र मोदींना पाठविले आहे. मोदींचा देशव्यापी लॉकडाऊनचा निर्णय आणि नंतर चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचा तसेच चाचण्या लक्षकेंद्री पद्धतीने घेण्याचा त्यांचा निर्णय अतिशय योग्य होता. देशातील अतिबाधित क्षेत्रे (हॉटस्पॉटस्) शोधून त्यांच्यावर लक्ष केंद्रित केल्याने आणि या भागांचा देशाशी संबंध तोडल्याने करोनाचा प्रसार भारतात झपाट्याने झाला नाही. भारतातील मृत्यूंची संख्याही जगाच्या तुलनेत मर्यादित राहिली. आपल्या धोरणांचे मला समाधान वाटते. चांगल्या कामांची नेहमी स्तुती करावयास हवी, अशी भलावण त्यांनी आपल्या या पत्रात प्रामुख्याने केली आहे.