पुणे ( प्रतिनिधी) – शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पुणे शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना तांदूळ वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने या स्थितीत विद्यार्थ्यांना तांदूळ वाटणे शक्य होणार नाही. त्यामुळे लॉकडाऊन उठल्यानंतरच विद्यार्थ्यांना तांदूळ वाटप करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे.
करोना विषाणूचा प्रसार गेल्या महिन्यापासून दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे शाळा व महाविद्यालये बंदच ठेवण्यात आली आहेत. आधी १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन होता. त्यात आता ३ मे पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील शाळांच्या पाठोपाठ आता राज्यातील शहरी भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना ही तांदूळ वाटप करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी राज्यातील सर्व महापालिका आयुक्त , जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, नगरपरिषद व नगरपालिका, कटकमंडळाचे मुख्याधिकारी यांना नियोजन करुन विद्यार्थी, पालक यांना धान्य वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पुणे शहरात सेंट्रल किचनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्यात येतो. पुण्यात २१ सेंट्रल किचन असून या ठिकाणी २ लाख ४०० किलो तांदूळ शिल्लक आहे. एकूण ६४० शाळांमधील २ लाख ८ हजार ४५० विद्यार्थ्यांना हा तांदूळ वाटप करण्यात येणार आहे. महापालिकेच्या २९३ शाळा असून यात ७९ हजार १८५ विद्यार्थी आहेत. खासगी अनुदानित शाळा ३४७ असून यात १ लाख २९ हजार २६५ विद्यार्थी आहेत. इयत्ता पहिली ते पाचवीचे १ लाख २१ हजार ९ तर इयत्ता आठवीचे ८७ हजार ४४१ विद्यार्थी आहेत. एक महिन्यातील शिल्लक तांदूळाचा साठा विचारात घेता प्रत्येक विद्यार्थ्यांना सव्वा ते दीड किलो या समप्रमाणात तांदूळ वाटप करता येणार आहे. सेंट्रल किचनमध्ये गेल्या दीड महिन्यापासून तांदूळ पडून आहे. प्रत्येक शाळांमध्ये या तांदूळ मालाची वाहतूक करण्यासाठी गाड्यांची, कामगारांची व्यवस्था करावी लागणार आहे. आता ही व्यवस्था होणे कठीण दिसते आहे. त्यातच या तांदूळ फार दिवस पडून राहिल्यास तो खाण्या योग्य राहणार की नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागला आहे.
शहरातील बहुसंख्य शाळा या दाट लोकवस्तीच्या व झोपडपट्टीच्या भागात आहेत. त्यातच शहरातील करोना रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे. अशा पार्श्वभूमीवर शाळांमध्ये विद्यार्थी व पालकांना बोलावून तांदूळ वाटप करणे योग्य ठरणार नाही. याबाबतची महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक झाली. यात सर्वांगीण अनुषंगाने चर्चा करण्यात आली. अखेर लॉकडाऊन उठल्यानंतरच विद्यार्थ्यांना शाळांमध्ये तांदूळ वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पुणे महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी मीनाक्षी राऊत यांनी दिली आहे