20 एप्रिलनंतर कमी कर्मचाऱ्यांवर कामकाज
पुणे – करोनाचा संसर्ग न झालेल्या क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे कामकाज एप्रिल 20 पासून सुरू करण्यास सरकारकडून परवानगी मिळाली आहे. परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत माहिती-तंत्रज्ञान कंपन्या किमान मनुष्यबळाच्या आधारावर काम करतील, असे सांगण्यात आले.
माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांची शिखर संस्था असलेल्या नॅसकॉमने सांगितले की, सुरुवातीला आम्ही कार्यालयांमध्ये फक्त 15 ते 20 टक्के लोकांना येण्यास सांगणार आहोत. बाकी काम वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानंतर कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल, असे नॅसकॉमने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना अत्यल्प मनुष्यबळाच्या आधारावर काम करण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांनी आपले बहुतांश काम वर्क फॉर्म होमच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला होता. भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्या भारतातील विविध उद्योगांना सेवा देत नाहीत तर जागतिक कंपन्यांना सेवा देतात.
त्यामुळे भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे काम चालू ठेवणे गरजेचे आहे, असा आग्रह सरकारकडे देशातून आणि परदेशातून होत होता. त्यावर विचार करून गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.