Maharashtra Unseasonal Rain : गेली दोन-तीन दिवस राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. भंडारा आणि अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर कायम असून येथील शेतकऱ्यांचे या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे पपईसह केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत.
भंडारा जिल्ह्यातील मागील तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस सुरु आहे. याचा फटका भातपिकांसह पालेभाजी पिकांनाही बसला आहे. मिरची पिकालाही याचा फटका बसला. अवकाळी पावसाने ही पिकं जमिनदोस्त झाली आहेत. तर, अनेक शेतातील मिरची पीक जळून खाली पडल्यानं शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
अकोला जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यात हिवरखेडसह झरी बाजार, दिवाणझरी, चिचारी, चंदनपुर नया खेडा, उंबर शेवडी, कार्ला यासह अनेक गावांना फटका बसला आहे. शेकडो एकरावरील पपई व केळीच्या फळबागा भुईसपाट झाल्या आहेत. काल अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात वादळाची तीव्रता इतकी होती की मोठमोठे अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत. अनेक घरांची पडझड झाली आहे. तर संत्रा, आंबा, केळी, पपई, ज्वारी, कांदा, भुईमूग, ज्वारी, अशा कित्येक फळे, भाजीपाला धान्य आणि विविध पिकांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, पुढील काही दिवस राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं देखील करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्यात काही ठिकाणी पडत असलेल्या अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान होत आहे. काही ठिकाणी या पावसामुळं शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास हिरावला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.