बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या “शहेनशाह’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अनेक वर्षे झाली आहेत. पण 1988 साली रिलीज झालेल्या या चित्रपटातील “रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है’ हा डायलॉग आजही लोकांच्या तोंडी आहे. दरम्यान, चाहत्यांसाठी एक चांगली बातमी असून हा चित्रपट पुन्हा पाहायला संधी त्यांना मिळणार आहे. त्याचे असे की, लॉकडाऊननंतर या चित्रपटाचा रीमेक होणार असल्याची बातमी आहे.
दिग्दर्शक टीनू आनंद एका मुलाखतीत म्हणाले की, मी शहंशाहचा रीमेक बनवू इच्छित आहे, पण सध्या सुरू असलेल्या करोनाचा प्रादुर्भाव कमी होणे आवश्यक आहे. माझे रीमेक करण्याचे निश्चित आहे, पण ते कधी सुरू करणार हे आताच सांगू शकत नाही. या चित्रपटाविषयी अद्याप काहीही निश्चित नाही. यासाठी नायक कोण असेल, पण ही भूमिका रणवीर सिंगने साकारावी, अशी माझी इच्छा आहे. लॉकडाऊननंतर याबद्दल आम्ही दोघेही बोलू, अशी आशा आहे.
या चित्रपटाच्या रीमेकसाठी अनेकजणांनी राइटस् घेण्याचा प्रयत्न केला आहे. “शहंशाह’ चित्रपट 32 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आता त्याचा रीमेक साकारताना अनेक बदल करावे लागणार असल्याचे टीनू आनंद यांनी सांगितले. दरम्यान, 2016 मध्येही या चित्रपटाचा रीमेक करण्यात येणार असल्याची चर्चा रंगली होती.