अमृतसर : पंजाबमध्ये करोनाचा सामुहिक संसर्ग झाला आहे, असे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी स्पष्ट केले. या साथीचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी सहकार्य करा, अशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली. त्याचवेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी लॉकडाऊन जिल्हानिहाय शिथिल करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे करोनाने पंजाबमध्ये तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रसार माध्यामांना अमरिंदरसिंग यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, राज्यात काल 27 नवे बाधित सापडले. त्यातील बहुसंख्य हे समूह संसर्गातून संक्रमित झालेले होते. या बाधितांनी कोणताही प्रवास केला नव्हता. त्यामुळे आमची चिंता वाढली आहे. चंदिगढमधील एक महिला केवळ बाजारहाटीसाठी बाहेर पडली होती. तीच्या संपर्कातील सर्व जणअंची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
केंद्र सरकारला मदतीचे साकडे घालताना ते म्हणाले, केंद्र सरकारच्या मदतीशिवाय कोरोनाशी लढण्याची यंत्रणा कोणत्याही राज्याकडे नाही. सुमारे 13 लाख जणांना आम्ही अन्न निवारा आणि निधी देत आहोत. ही मदत आम्ही आमच्या पातळीवर करत आहोत. त्यामुळे मी केंद्र सरकारला सर्व राज्यांना मदत करण्याचे आवाहन करत आहे, असे ते म्हणाले.
केंद्राचा नकार अन् नवे संशोधन
करोनाच्या साथीचे चार टप्पे करण्यात आले आहेत. पहिला (परदेशात) प्रवास केलेले, दुसरा टप्पा स्थानिक संपर्क, तिसरा सामुहिक संसर्ग आणि चौथा टप्पा साथ अशी वर्गवारी जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. मात्र केंद्रीय आरोग्य खात्याने भारतात सामुहिक संसर्गाची पातळी गाठली नसल्याचे वेळोवेळी ठामपणे सांगितले आहे. दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या संशोधनात करोनाबाधितांपैकी 50 जणांपैकी एकाला श्वसनाचे तीव्र विकार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
करोनाचा सामुहिक संसर्ग झाल्याचे कोणाला आवडणार नाही. मात्र वस्तूस्थिती हीच आहे की सामुहिक संसर्गाची पातळी गाठली आहे.
डॉ. टी. जेकब जॉन
माजी प्रमुख, ख्रिस्तीयन मेडिकल कॉलेजचे विषाणूजन्य आजार विभाग
बाधिताची केस हिस्टरीचे अद्याप व्यवस्थित विश्लेषण केले जात नाही. त्यामुळेच सामुहिक सांसर्गाचा ब्रम निर्माण होत आहे.
डॉ. शोभा ब्रुर,
माजी प्रमुख, एम्सा सुक्ष्म जीवशास्त्र विभाग