– शंकर दुपारगुडे
पुणे – करोनाच्या संसर्गाने जगाची झोप उडाली असून बाधितांची संख्या लाखात गेली. भारतातही अनेकांना करोनाची लागण झाली आणि महाराष्ट्राचा बाधित आकडा हजाराच्या पुढे गेला आहे. करोनाचा संसर्ग वाढु नये म्हणून राज्य सरकारने लॉकडाउनचे पालन तंतोतंत करण्यासाठी रस्त्यावर नाकाबंदी केली आहे. जिल्हा, तालुक्यातील रहदारीचे रस्ते बंद केले. नागरिकांची वर्दळ कमी झाली. बाजारपेठा ठप्प झाल्या असून आर्थिक उलाढाली मंदावल्या आहेत. लॉकडाउनमुळे नागरिकांनी घरात बसून परिवारासोबत १५ दिवस आरामात घालवले.
बाहेरचे सर्व कामकाज, ताणतणाव बंद झाले, दररोजचा प्रवास थांबल्याने इंधनाची बचत झाली. त्याचबरोबर रस्ते अपघाताचे प्रमाण घटल्याने अनेकांचे प्राण वाचले. रस्त्यावर फिरताना प्रत्येकांच्या नाका-तोंडाला मास्क, रूमाल लावल्याने वातावरणातील संसर्ग कमी झाल्याने आजारी पडण्याचे प्रमाण घटले. बाहेरच्या हॉटेलमधील मसालेदार चमचमीत पदार्थ खाणे बंद झाले आहे.
यामुळे घरातील पौष्टिक सात्विक आहार वेळेवर घेतल्याने पोटदुखी, मळमळ, उलटी, अपचन, जुलाब या आजाराचा दुरवर संबंध राहीला नाही. दैनंदिन जीवनमान बदलले. तणाव कमी झाल्याने आजाराचे प्रमाण घटले. अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी-खोकला गायब झाला. मतभेद, संघर्ष, गाठीभेटी, दुजाभाव, कटुता, देवाण-घेवाण संपल्याने पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरीच्या पायऱ्या चढणे बंद झाल्या. बदललेल्या दिनचर्येतून गेल्या पंधरा दिवसात माणसांचे जीवनमान उंचावले. आजारी पडणाऱ्या रुग्णांची संख्या अनेक पटीने कमी झाली.
आरामदायी तंदुरुस्त जीवनामुळे मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले. करोना व्हायरसची बाधा होवून मृत्युचे प्रमाण वाढण्याच्या भितीने लॉकडाउन करण्यात आले. आणि दुसरा चमत्कार घडला तो म्हणजे इतर आजार व कारणामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण घटले. किरकोळ होणारे आजार कमी झाले. खुन- मारामारी, चोरी, दरोडा, अत्याचार, लुटमार, फसवणूक अशा विविध प्रकारच्या गुन्हेगारीला आळा बसला.
गेल्या पंधरा दिवसात किरकोळ अपवाद वगळता केवळ चौघांचा मृत्यु झाल्याची नोंद कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आहे. इतर वेळी आठवड्याला १५ ते २० पेक्षा ज्यास्त लोकांचा विविध कारणाने मृत्यू होत होता. गेल्या पंधरा दिवसात कोपरगाव अमरधाम येथे फक्त १२ नागरीकांचा अंतविधी झाला. त्यात दिर्घ आजाराने जेष्ठ नागरीकांचा मृत्यू झालेले सर्वाधिक आहेत. यावरून करोनाच्या काळात लॉकडाउन केल्याने नागरीकांचे मृत्यूचे प्रमाण घटल्याचे उघड झाले.
अनेक रुग्णालयात १० टक्के सुध्दा रुग्ण नाहीत, करोनाच्या भितीने नागरीकांचे नित्याचे आजार गायब झाले कि काय अशी शंका येते. वातावरणातील प्रदूषण कमी झाले, धुळ नाही, दुषित पाणी पिणे नाही, जीवनमानासह वातावरणातील या बदलाने ह्दयविकार,अस्थमा, रक्तदाब मधुमेह या आजारांची दहशत कमी झाली असल्यासारखे लोक घरी शांत बसुन आहेत. दारु, तंबाखू, गुटखा, पान, सिगारेटचे दुकाने बंद झाल्याने स्वयंघोषित व्यसन मुक्ती झाली. पारिवारीक सौख्य वाढल्याने घरात आनंदाची खसखस पिकली आहे. कुटूंबातील सर्वजण एकत्र बसून गप्पाटप्पा, खेळ खेळत दिवस घालवतात.
आर्थिक अडचणी काही प्रमाणात वाढल्या असतील पण अवांतर खर्च बऱ्यापैकी कमी झाला आहे. जगण्यासाठी लागणाऱ्या मुख्य गरजा अनेकांना समजल्याने अवांतर खर्चाला फाटा दिला जातो. करोनामुळे जगावर संकट आले तरी दैनंदिन नित्याचे संकटे लॉकडाउनने कमी केले आहे. अनेकांचे प्राण विविध घटनांमधून वाचत आहेत. तेव्हा नागरीकांनी लॉकडाउनच्या काळात घरात बसुन प्रशासनाला सहकार्य केले तर नक्कीच सर्वांचा फायदा होईल. लॉकडाउन केले नसते तर विविध संसर्गाने अनेकांचे प्राण गेले असते. आर्थिक अडचणीबरोबर आरोग्याच्या महासंकटातून वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न प्रत्येकांना करावे लागले असते. घरात बसल्याने फायदा होतोय पण मानवी नुकसान होणार नाही.