जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश
नगर – नगर जिल्ह्यात विलगीकरण कक्षात (क्वारंटाईन) ठेवण्यात येणाऱ्या संशयितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यात आणखी संशयित वाढूच नयेत म्हणून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या रुग्णांना बाहेरचे जेवण बंद करण्यात आले आहे. त्या रुग्णांच्या कोणत्याही नातेवाईकास आता रुग्णाला भेटता येणार नसल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आणि बाहेरील व्यक्तींचा संपर्क टाळण्यासाठी ही पावले उचलण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या संदर्भात आज कडक आदेश जारी केले आहेत. क्वारंटाईन कक्षासाठी प्रमुख अधिकारी नेमावा, बाहेरील व्यक्तींना प्रतिबंध करावा, तसेच कुठल्याही प्रकारचे बाहेरचे खाद्यपदार्थ व भोजन देण्यास तातडीने प्रतिबंध करण्यबाबत आज अद्यादेश जारी करण्यात आला आहे.
महापालिका आयुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील क्वारंटाईन कक्षासाठी नेमलेल्या प्रमुख अधिकाऱ्यांनी विलगीकरण कक्षाची व परिसराची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याची योग्य ती दक्षता घ्यावी. त्याठिकाणी आरोग्य विभागामार्फत नेमणूक केलेल्या व्यक्तींच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना वा निरीक्षणाखाली ठेवलेल्या व्यक्तींच्या नातेवाईक आणि अभ्यागतांनाही भेट देण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
जिल्ह्यात करोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळून येत आहेत. या बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन कक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याअनुसार, जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा केल्या आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.