डब्बल सीट असणाऱ्या १०० च्या वर दुचाक्यांवर कारवाई
जामखेड (प्रतिनिधी) : साहेब, डोके दुखायला लागले आहे, गोळी घ्यायला चाललो आहे…. दवाखान्याला चाललो आहे…. साहेब आमच्याकडचे दुकाने बंद आहेत…म्हणून खरेदी करायला आलो आहे ,रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या या उत्तरांनीच त्यांना अडचणीत आणले. जामखेड तहसील विभाग व पोलिसांनी त्यांचा कावेबाजपणा ओळखला आणि महसूल विभागाचा प्रसाद मिळाला. पहिल्याच प्रसादात अनेकांची डोकेदुखी क्षणात गायब झाली, दवाखाना विसरला आणि मेडीकल दुकानही लगेच सापडले. अनेकवेळा विनंत्या करूनही रस्त्यावर मोकाटपणे फिरणाऱ्यांची डोकेदुखी महसूल अधिकारी आणि पोलिसांनी आपल्या पद्धतीने प्रसाद देऊन थांबवली.
जामखेड तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढु लागली आसल्याने अखेर महसूल विभागाने रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे जामखेड चे तहसीलदार विशाल नाईकवाडे सह महसूलच्या महीला कर्मचारी देखील रस्त्यावर उतरून डब्बल सीट दुचाकींवर कारवाई करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.
जामखेड तालुक्यात सध्या लोणी येथे 2, जवळके येथे 2, मोहरी 1 व जायभायवाडी येथे 1 रुग्ण आहेत. कोरोनामुक्त झालेल्या जामखेडला पुन्हा कोरोनानी शिरकाव केला असून, निष्काळजीपणा आणि मुंबई-पुण्याहून येणाऱ्या बरोबरच या दोन्ही शहरात जाऊन येणाऱ्या नागरिकांनी कोरोनाचा वानवळा आणला आहे. ग्रामीण भाग बाधित केला आहे. जामखेडच्या प्रशासनाने गेली तीन महिण्यांपासून डोळ्यात तेल घालून काम केले, मात्र आता मात्र हात टेकले आहेत.
शहरातील जयहिंद चौक, खर्डा चौक, नगर रोड या परिसरात रोज नागरिकांची गर्दी पहायला मिळाली. यातून शहरात कोरोनाच गेल्यासारखे चित्र पहायला मिळत होते.या चौकामध्ये दररोज वाहनांची प्रचंड गर्दी असते. या संपूर्ण गर्दीला नियंत्रित करण्यासाठी जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे,नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांच्यासह तलाठी,कोतवाल,जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी ,नगरपरिषदेचे कर्मचारी यांनी सकाळपासून कंबर कसली.
रस्त्यावर थांबून गप्पा मारणाऱ्यांना लाठीचा प्रसाद मिळाला रस्त्यावर येणाऱ्या वाहनधारकांना कशाला, कुठे बाहेर जात आहे याची विचारणा करण्यात आली. दुचाकी घेऊन ट्रिपल सिट फिरणारे दुचाकी धारकांवर दंडात्मक कारवाई वाहनधारकांचे वाहन जप्त करण्यात आले. जप्त केलेली ही वाहने तहसील कार्यालयात जमा केली. त्यावर दंड आकारला. यामुळे विनाकारण वाहनांची गर्दी करणाºया नागरिकांना चांगलाच चोप बसला. दुपारनंतर ही गर्दी ओसरली. दिवसभर वाहनांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरूच होती. नागरिक विविध कारणे पुढे करीत शहरात प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करीत होते.