करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पीएमपी बस पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवली होती. मात्र, 17 मार्चपासून पीएमपी बंद असल्याने आतापर्यंत सुमारे 25 कोटींचे उत्पन्न बुडाले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पीएमपीची पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सर्वसामान्य नागरिकांना सेवा बंद केली आहे. केवळ डॉक्टर, नर्सेस, पोलीस, महावितरण कर्मचारी, अग्निशमन कर्मचारी, सुरक्षारक्षक आदी घटकांतील प्रवाशांना प्रवास करता येत आहे.
तसेच, दैनंदिन दिवशी पीएमपीचे उत्पन्न 1 कोटी 50 लाखांपर्यंत होते. मात्र, आता सर्वसामान्य नागरिकांना बसमध्ये प्रवेश नसल्याने मोठा आर्थिक फटका बसत आहे. पीएमपी फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी दिवसरात्र सुरू आहे. दोन्ही शहरात 51 मार्गांवर बसचे संचलन सुरू असून या बसच्या माध्यमातून केवळ 35 ते 40 हजारांचे उत्पन्न मिळत होते.