गडचिरोली – राज्यात करोना विषाणूंचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे परिणाम भारतासह राज्यांवरही होताना दिसत आहे. प्रत्येक देश आपपल्या पद्धतीने त्याच्यावर मात करण्यात प्रयत्न करीत आहे. देशावर सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट ओढावलेले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व मंदिरांनी दानाच्या स्वरुपात जमा झालेली 50 टक्के रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करावी, अशी मागणी करणारे पत्र एका 12 वर्षाच्या मुलीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.
अपेक्षा शाम रामटेके असे या मुलीचे नाव आहे. ही मुलगी जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सातवीत शिकत आहे. लॉकडाऊनमुळे देशातील जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे करावा लागत आहे. असंघटीत कामगार, रोजंदारीवर काम करणारे मजूर आणि इतर वर्गांना सरकार मदत करत आहे. पण अद्याप बऱ्याच भागात ती पोहोचलेली नाही. सरकारने मदतीसाठी लोकांकडे आवाहन केले आहे. अनेक सामाजिक संघटनांसह, मोठे उद्योगपती, सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे आले आहेत.
देशभरात राज्यात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आपल्याला आरोग्य सेवा मजबूत करावी लागणार आहेत. दुसरीकडे लॉकडाऊनमुळे जनतेलाही मदतची आवश्यकता आहे. अशाप्रकारे ओढावलेल्या दुहेरी संकटात सर्व मंदिरात दानाच्या स्वरुपात खूप पैसा जमा होतो.
देशात संकट असताना भाविकांनी देवाला सुरक्षित ठेवण्यासाठी दिलेल दानाचा काही तरी उपयोग झाला पाहिजे. यामुळे मंदिरात दानाच्या स्वरुपात जमा झालेल्या निधीतील 50 टक्के रक्कम ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करावी, असे अपेक्षाने पत्रात लिहिले आहे.