मुंबई – दादरच्या भाजीपाला मार्केटमध्ये लॉकडाउनच्या काळातही भाजी खरेदीसाठी होणारी गर्दी आटोक्यात येत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे मार्केट पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
दादरच्या सेनापती बापट मार्गावर घाऊक भाजीपाला मार्केट आहे. या ठिकाणी अनेक मुंबईकर नियमित भाजी खरेदी करताना दिसतात. मात्र करोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे गर्दी टाळण्यासाठी या मार्केटचे चार ठिकाणी विभाजन करण्यात आल होते. तर काही टक्के मार्केट हे दादरमध्ये ठेवण्यात आले होते. पण घाऊक मार्केटमधील गर्दी कमी होत नसल्याने पालिकेने हे मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आता हे मार्केट दहिसर जकात, एमएमआरडीए ऍक्झिबिशन सेंटर, मुलुंड जकात नाका, सोमय्या ग्राऊंड या ठिकाणी सुरु राहणार आहे.
करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेने गर्दी करु नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार करत आहेत. पण याकडे जनता पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. अनेक ठिकाणी झुंडीने गर्दी करत आहे. दादरमध्येही भाजी खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता या मार्केट चार ठिकाणी विभाजन करण्यात आले. यासाठी भाजी विक्रेत्यांना मैदान देण्यात आली. मात्र या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
वांद्रे कुर्ला संकुल परिसरातील एम.एम.आर.डी.ए मैदानावर अनेक भाजीचे ट्रक टेम्पो या परिसरात आले आहेत. पण तरीही या ठिकाणी कोणीही सोशल डिस्टन्सचा नियम पाळत नाही. तसेच तोंडाला मास्कही लावत नाही. यामुळे अनेकांना करोनाची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.