नवी दिल्ली – जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणूविरोधी लढयातील भारताच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. भारतातील टाळेबंदीचे डब्ल्यूएचओचे विशेष प्रतिनिधी डॉ. डेव्हिड नवारो यांनी समर्थन केले आहे. युरोप आणि अमेरिकेसारख्या विकसित देशांनी कोरोना संकट गांभीर्याने घेतले नसताना भारतात मात्र यावर जलदगतीने काम झाले आहे. भारतात उष्ण हवामान आणि हिवतापामुळे नागरिकांमध्ये उत्तम रोगप्रतिकारकक्षमता आहे. भारतीयांचे शरीर करोनाला पराभूत करेल अशी अपेक्षा करतो, असे नवारो म्हणाले.
करोनाविरोधात मोदी सरकारने उचललेल्या कठोर पावलांचे नवारो यांनी कौतुक केले आहे. टाळेबंदीमुळे मोठा त्रास होत असला तरीही याचमुळे लवकर दिलासा मिळणार आहे. भारताकडे करोनाला रोखण्याची अविश्वसनीय क्षमता आहे. भारताने लोकांना संसर्गापासून बचावाची माहिती दिली आहे. पंतप्रधान आणि सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्रितपणे पावले उचलल्याचे नवारो यांनी म्हटले आहे.
इटली आणि अमेरिकेत कोविड-19 विषाणू समुदायात फैलावत राहिला. या देशांनी लक्षणे आढळून आल्यावरही लोकांना विलग करणे टाळले. वेगाने कारवाई न केल्यास अडचणी वाढू शकतात. जलद पावले उचलणे हाच एकमात्र उपाय असून भारतात योग्यप्रकारे अंमलबजावणी केली जात असल्याचे नवारो यांनी नमूद केले.
सर्व नागरिकांची चाचणी करणे युरोप आणि अमेरिकेतही शक्य नाही. संशयित व्यक्तीला त्वरित विलग केले जावे. या प्रयत्नांमधूनच करोनाचा संसर्ग नियंत्रित केला जाऊ शकतो. टाळेबंदीमुळे गरीब अधिकच गरीब होतात. अन्नधान्याच्या किमती वाढू लागतात आणि लोकांना त्रास सहन करावा लागतो. परंतु आजाराला रोखण्यासाठी हे आवश्यक आहे. स्वतःच्या वर्तनात बदल घडवून आणत समुदायाला संसर्गापासून वाचवू शकतो, असे नवारो म्हणाले.
मास्कचा वापर व्हावा
संसर्ग झालेल्या लोकांनी मास्कचा वापर करणे गरजेचा आहे. तसेच लोकांनी परस्परांपासून किमान दोन मीटरचे अंतर राखावे. मास्क वापरण्यासह लोकांना खोकण्याच्या आणि शिंकण्याच्या योग्य पद्धतीची माहिती असावी. आरोग्य कर्मचाऱयांना सुरक्षेची सर्वाधिक गरज आहे. ते प्रंटलाईनवर कार्यरत असून रुग्णांच्या संपर्कात येत असतात. अधिकाधिक लोकांनी मास्क परिधान करावा, अशी सूचना त्यांनी केली.
भारतासारख्या उष्ण हवामान असलेल्या देशांमधील लोक संसर्गजन्य आजारांना वारंवार तोंड देत असतात. या लोकांची रोगप्रतिकारक क्षमता तुलनेने अधिक असते. यानुसार कोविड-19 विषाणू भारतीयांच्या शरीरातच पराभूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. बीसीजी लसीमुळे लोकांना संसर्गापासून मदत मिळू शकते. तसेच लोकांचा वयोगट आजाराला तोंड देण्यासाठीचा महत्त्वाचा घटक आहे. विकसनशील देशांमध्ये तुलनेने तरुण लोकसंख्या असल्याने हा आजार वेगाने पसरणार नाही.
– डॉ. डेव्हिड नवारो, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी