संकटाची व्याप्ती वाढत चाललीय. अजूनही रुग्णसंख्येचा “गुणाकार’ सुरू झालेला नसला, तरी “बेरीज’ छातीत धडकी भरवणारी आहे. अशा स्थितीत जर गुणाकार सुरू झाला, तर आपली काय हालत होईल, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. सुदैवानं अत्यंत तंत्रसमृद्ध जगात आपण जगत आहोत आणि देशोदेशीची परिस्थिती आपल्यासमोर दररोज येतीय. काही दिवसांपूर्वीच करोना विषाणूची थट्टा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलू लागलेत, हे आपण ऐकलंय. मृतांचा आकडा लाखांमध्ये राखणं शक्य झालं, तरी आपण चांगलं काम केलं असंच आपल्याला वाटेल, हे त्यांचे शब्द आहेत. इटली, स्पेन, ब्रिटनमध्ये काय परिस्थिती आहे, हेही आपण पाहतोय. तरीसुद्धा आपण अजूनही “निवांत’ आहोत, असंच म्हटलं पाहिजे. सक्तीनं एकमेकांपासून दूर गेलो असलो, तरी तंत्रज्ञानानं आपण जोडलेलेच आहोत आणि त्याचा वापर आपण कसा करतो आहोत, हे एकदा जरी तपासून पाहिलं तरी आपल्याला विषयाचं गांभीर्य समजलंय असं बिलकूल वाटणार नाही. आपल्याकडे अजूनही कम्पूशाही सुरूच आहे. एका समूहानं दुसऱ्या समूहाच्या चुका दाखवायच्या, दुसऱ्या समूहानं पहिल्या समूहाची चूक दाखवून द्यायची, एकमेकांना रक्तबंबाळ होईपर्यंत शाब्दिक ओरखडे काढायचे, ही परिस्थिती निवडणुकीपूर्वी एकवेळ समजून घेता येईल. पण संसर्गाची सध्याची परिस्थिती कधी बदलेल, याचा नेम नसतानासुद्धा हेच चालू असणं अत्यंत दुर्दैवी आहे.
“शाप की वरदान’ असं शीर्षक देऊन अनेक विषयांवरचे निबंध आम्ही शाळेत असताना लिहिले होते, ते आज आठवू लागलेत. जे आपल्या हातातलं बाहुलं बनायला हवं होतं, त्याच्याच हातचं बाहुलं आपण स्वतःच बनत चाललो आहोत, हे पाहून हातात आलेलं तंत्रज्ञान हा सध्या तरी शापच वाटू लागलाय. एकमेकांची उणीधुणी काढायचीसुद्धा वेळ ठरलेली असते. परंतु याचं भान गेल्या दोन दिवसांत स्वतःला बुद्धिवादी म्हणवणाऱ्यांपासून कुणालाही राहिलेलं नाही. जातिधर्माचा बिलकूल विचार न करता हल्ला करणारा विषाणू आपल्यासमोर आहे. अशा वेळी आपल्या मतांशी मिळतंजुळतं काहीही आपल्याला खरं वाटतंय आणि आपल्या मतांशी विसंगत असलेलं काहीही आपल्याला “फेक’ वाटतंय, याचा अर्थ आपण आपली विचारशक्ती हरवून बसलो आहोत.
खोटं बोलून एकमेकांना फसवण्याचा दिवस नुकताच येऊन गेला. संकटाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जाहीर केलं होतं की, आपल्यावर आलेल्या संकटाच्या बाबतीत खोट्या बातम्या पसरवणं खपवून घेतलं जाणार नाही. व्हॉट्सऍपवरून जर फेक न्यूज पसरवल्या, तर “एप्रिल फूल’चा विचार न करता ऍडमिनला थेट अटक करण्यात येईल. दिवसभर खोटं बोलण्याची किंबहुना खऱ्याखोट्याचा विचार न करण्याची सोय राहिली नाही आणि लोक घुसमटले.
या घुसमटीमुळे काहींनी मग पोलिसांवरच राग काढला. 52 व्हॉट्सऍप ऍडमिनना पोलिसांच्या सायबर विभागानं पकडल्याचीच थाप मारली. म्हणजे, थापा मारणाऱ्यांना अटक झाल्याची थाप! आता पकडलेल्या मंडळींना 1 वर्षापासून 5 वर्षांपर्यंतची शिक्षा होणार, असे संदेश वाऱ्यासारखे पसरले. अखेर असं काहीही घडलं नसल्याचे सांगायला पोलिसांना रिंगणात उतरावे लागले. धोक्याचा विचार न करता रात्रंदिवस राबणाऱ्या पोलिसांना त्रास देताना काहीच वाटत नसेल, तर संवेदनशीलता संपल्याचं जाहीर करून टाकावं, हेच बरं!
– हिमांशू