राज्यावरील कोरोना विषाणूचे संकट बळावले असून राजधानी मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या १६२ वर पोहोचली आहे. अशातच या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे. याबाबतची माहिती देताना टोपे यांनी, मुंबईतील करोनाबाधितांची संख्या १६२ वर पोहोचली असून पाच हजारांपेक्षा अधिक जण हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये असल्याचं सांगितलंय. मुंबईतील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी आज मुंबई महापालिकेच्या वॉर रुमला भेट देत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
या चर्चासत्रानंतर बोलताना राजेश टोपे यांनी सांगितलं की, “मुंबईतील करोनाबाधितांची संख्या १६२ झाली आहे. पाच हजारांहून अधिक जण असे आहेत जे अशा लोकांच्या संपर्कात आले असून हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आहेत. ही संख्या आता ५३४३ इतकी आहे. या सर्वांना विलगीकरणात ठेऊन चाचणी केली जाणार आहे. सध्या सर्वांवर लक्ष ठेवलं जात आहे. चार हजार लोक या सर्वांवर लक्ष ठेवून आहेत”.
कोरोना विरोधातील लढ्यासाठी राज्यातील आरोग्यविषयक सुविधांबाबत बोलताना त्यांनी, “मुंबई शहरात पाच सरकारी, सात खासगी रुग्णालयांमध्ये करोनचाी चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध असून २ हजार चाचण्या दिवसाला होऊ शकतात इतकी क्षमता आहे. पण सध्या दिवसाला १२०० चाचण्या होत आहेत. प्रोटोकॉलप्रमाणे चाचणी केली जात आहे. त्यामुळे अतिरिक्त करण्याची आज गरज नाही. तसंच ४६ नवे व्हेंटिलेटर्स आज मिळाले आहेत. १ लाख एन-९५ मास्क उपलब्ध आहेत,” अशी माहिती दिली.