- लोणावळा पोलिसांची कारवाई
लोणावळा – संचारबंदी काळात विनाकारण वाहने घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या विरोधात लोणावळा पोलिसांनी कारवाईचे हत्यार उपसले आहे. या कारवाई अंतर्गत अशी सर्व वाहने पुढील तीन महिन्यांसाठी जप्त करून त्यांच्या वाहनचालकांच्या विरोधात भादवी कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
करोना या संसर्गजन्य विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र नागरिकांकडून या आदेशाचे उल्लंघन होण्याच्या घटना सर्रासपणे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. लोणावळा शहराच्या मुख्य बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेऊन, ती टाळण्यासाठी नगरपरिषदेने प्रत्येक विभागात भाजीवाले नेऊन बसवले.
याशिवाय प्रत्येक विभागात, कसब्यात किराणा मालाची दुकाने उघडी ठेवण्यात आली आहेत. मात्र असे असतानाही ते सर्व सोडून नागरिक मोठ्या संख्येने भाजी घेण्याच्या नावाखाली किंवा किराणा घेण्याच्या सबबीखाली मुख्य बाजारपेठेच्या दिशेने बाहेर निघत आहे.
नगरपरिषद तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने अनेकदा आवाहन करूनही लोक अजूनही ऐकण्याच्या मनस्थितीत पोचलेले नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाला अखेर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उचलणे भाग पडले आहेत. मंगळवारी सकाळपासून दुपारपर्यंत लोणावळा शहर वाहतूक पोलिसांनी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 15 वाहने जप्त करून घेतल्या असून, पुढील तीन महिने ही वाहने सोडल्या जाणार नाही, असे जाहीर केले आहे.
तसेच या सर्व वाहनचालकांच्या विरोधात भादवी कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई यापुढे अशीच सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.