मुंबई – करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने लॉकडाऊन करून सार्वजनिक वाहतुकसेवा बंद केली आहे. मात्र काही लोक मिळेल त्या वाहनातून व जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचे प्रकार पुढे येत आहेत. कृपया असे करू नका, आहेत तेथेच राहा, अडचण असेल तर तुमची सगळी व्यवस्था सरकार करेल, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद करू नयेत, करोनाची लक्षणं असणाऱ्या रुग्णांना सरकारी रुग्णालयात पाठवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना वाट्टेल त्या मार्गाने आपल्या गावी परतण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आहे त्या गावात थांबण्याचे आवाहन केले. काही लोक जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांतून जीव धोक्यात घालून प्रवास करताना आढळत आहेत. राज्यांच्या सीमा बंद आहेत. इतर राज्यांतील अडकलेल्या नागरिकांची राज्य शासन काळजी घेईल. आपले त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत बोलणेही झाले आहे. या नागरिकांची इथेच आम्ही काळजी घेऊ. त्यांना लॉकडाऊन पूर्ण होईस्तोवर परत पाठवणे शक्य होणार नाही. महाराष्ट्रातले लोक जर इतर राज्यांत कुठे अडकले असतील तर त्यांचीही त्या-त्या राज्यांनी काळजी घ्यावी, अशा सूचना दिल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
रिटेल सप्लाय चेन आणि होम डिलिव्हरी सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक निर्देश दिले आहेत. त्यामुळे वस्तूंचा पुरवठा हा व्यवस्थित होत राहील, याची खात्री बाळगा. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं 24 तास उघडी ठेवण्याचा निर्णय तेथे गर्दी होऊ नये म्हणून घेतला आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या संकटात राज्यभरातून शिवभोजन केंद्रांनी गरजू आणि भुकेल्या लोकांची भूक भागवावी. त्यांचे उद्दिष्ट्यही आम्ही 1 लाख वाढवत आहोत. त्याचा लाभ घ्यावा, मात्र त्यासाठी गर्दी करून आरोग्याला धोका होईल असे करू नका, असे त्यांनी सांगितले. शिर्डी संस्थानाने 51 कोटी रुपये सहायता निधीसाठी दिले आहेत. सिद्धीविनायकने देखील 5 कोटी देऊ केले आहेत, अशी माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.
आरोग्यसेवक व पोलिसही माणसंच आहेत !
करोनाने तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य कर्मचारी व पोलीस अहोरात्र प्रयत्न करत आहेत. तिही माणसंच आहेत, त्यांच्यावर मोठा ताण आहे. त्यांच्या कुटुंबातील लोकांनाही त्यांची गरज आहे. पण ते आपल्यासाठी बाहेर पडतायत. काम करतायत, त्यांना सहकार्य करा, त्यांच्याशी हुज्जत घालू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद करू नयेत, करोनाची लक्षणं आढळल्यास अशा रुग्णांना सरकारी रुग्णालयात पाठवावे, असे आवाहन त्यांनी केले.