नवी दिल्ली : देशावरील कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी सरकारतर्फे विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. अशातच आज भारतातील नामांकित उद्योग समूह असलेल्या टाटा ग्रुपने कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी ५०० कोटींची मदत कोरोना विषाणूशी लढण्याकरता जाहीर केल्यानंतर टाटा ग्रुपच्याच टाटा सन्सकडून देखील १ हजार कोटींची मदत जाहीर झाली आहे. त्यामुळे कोरोना विषाणूशी सामना करण्यासाठी टाटा ग्रुपकडून एकत्रितपणे एकूण १५०० कोटींचा मदत निधी जाहीर झाला आहे.
या निधीबरोबरच व्हेंटिलेटर आणण्यासाठी तसेच भारतातच व्हेंटिलेटर तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन म्हणाले. सध्या आपण सर्व कठीण प्रसंगातून जात आहोत, या संकटावर मात करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असं देखील त्यांनी सांगितले.
टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांनी शनिवारी टाटा ट्रस्टच्यावतीने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी तब्बल ५०० कोटींची मदतीची घोषणा केली. करोनाचे संकट हे मानवासमोरील कठीण आव्हान आहे. टाटा ट्रस्ट आणि टाटा समूहाने यापूर्वी कठीण प्रसंगात देशासाठी आवश्यक योगदान दिले आहे. आतापर्यंतचा हा देशासमोरील सर्वात मोठा प्रसंग असून या संकटात टाटा ट्रस्टकडून ५०० कोटींची मदत करण्यात येईल, असं ते म्हणाले.
टाटा ट्रस्टकडून मदत जाहीर झाल्यानंतर टाटा सन्सकडून देखील १ हजार कोटींची मदत जाहीर झाली. त्यामुळे टाटा समूह एकूण दीड हजार कोटींची मदत संकट निवारण्यासाठी करत आहे.