मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात तांडव केला आहे. त्यातच भारतातही कोरोना व्हायरसने आपले हातपाय चांगलेच पसरले आहेत. फोफावत जात आहेत. देशातील कोरोना बाधितांचा आकडा एक हजार पार गेला आहे.
देशात एकूण 1029 कोरोनाग्रस्त आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 19 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात एकूण 186 कोरोना बाधित आहेत. याच पार्श्वभूमीवर या करोना विषाणूच्या संसर्गाला बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने ‘जैविक युद्ध’ असे म्हटले आहे.
दरम्यान, “जगभरातील सर्वच देश सध्या करोना विषाणूशी लढत आहेत. या लढाईला आपण एक प्रकारचं जैविक युद्धच म्हणू शकतो. या युद्धामुळे अमेरिकासारखा विकसित देश देखील आर्थिकदृष्ट्या संकटात सापडला आहे. आपलीही अवस्था फारशी वेगळी नाही. २१ दिवसांच्या लॉकडाउनमुळे देशातील सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. दररोज आपले कोट्यवधींचे नुकसान होत आहे. आपण लवकरात लवकर या जैविक युद्धाला जिंकण्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हव्यात. अन्यथा आर्थिकदृष्ट्या आपण आणखी १० वर्ष मागे जाऊ.” असं कंगना म्हणाली आहे.