मुंबई (प्रतिनिधी) – शुक्रवारप्रमाणे शनिवारीही राज्यात आणखी 28 करोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या 181 पोहोचली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक 22 रुग्ण मुंबईचे, तर 2 रुग्ण नागपूर येथील आहेत. इतर 4 रुग्ण पालघर, वसई-विरार आणि नवी मुंबई परिसरातील आहेत. सध्या बधित आढळलेल्या आणि रुग्णालयात भरती असलेल्या 104 रुग्णांना करोना आजाराचे कोणतेही लक्षण नाही, तर 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान काल मुंबईत ज्या डॉक्टरांचा मृत्यू झाला तो करोनामुळे झाल्याचे आज निश्चित झाले. यामुळे राज्यातील करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या आता 6 झाली आहे.
राज्यात आज एकूण 323 जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 3816 जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 3391 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 181 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 26 करोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 17,295 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 5928 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार
राज्यातील करोनाबाधितांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असुन महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत आता करोना उपचाराचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या रुग्णांना कॅशलेस उपचाराची सुविधा मिळणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 1 एप्रिलपासून राज्यभरात या योजनेंतर्गत सुमारे 1000 रुग्णालयांचा समावेश होणार असल्याने त्यामध्ये करोनाबाधीत मोफत उपचार घेऊ शकतील. या महत्वपूर्ण निर्णयामुळे योजनेतील सहभागी रुग्णालयातील सुमारे 2000 व्हेंटीलेटर्स देखील उपलब्ध होणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली.
शुक्रवारी संध्याकाळी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आरोग्यमंत्री टोपे यांनी यामहत्वपूर्ण निणर्याबाबत दोघांशी चर्चा केली.
सध्या या योजनेत राज्यभरातील 492 खासगी रुग्णालये सहभागी असून त्यामध्ये दुपटीने वाढ होऊन 1000 रुग्णालयांचा समावेश होईल. कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यकता भासल्यास किमान 2000 व्हेंटीलेटर्स उपलब्ध होवू शकतात. त्याचबरोबर सुमारे एक लाख खाटाही यामाध्यमातुन उपलब्ध होणार असल्याचे टोपे यांनी संगितले.