नागठाणे -नांदगाव (ता. सातारा) येथे एकाच कुटुंबातील लोकांमध्ये घरगुती भांडणातून काल (दि. 26) रात्री जोरदार धुमश्चक्री उडाली. सख्खे भाऊ,सुना, नातवंडे यांनी एकमेकांवर लोखंडी घण, लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. बोरगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी धावल्याने पुढील अनुचित प्रकार टळला. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून बोरगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचे व अन्य कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. या धुमश्चक्रीत प्राध्यापकांसह इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा समावेश आहे.
याबाबत गणपत बंडू चव्हाण (वय 80) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, करोनाची साथ असताना मोठी सून सौ. सुनीता भानुदास चव्हाण हिने घरात पाळलेल्या कोंबड्या व शेळ्यांची घाण पाच दिवस काढली नसल्याचे नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याने तिला विचारणा केली. त्याचा राग येऊन मुलगा भानुदास, नातू सुशांत व सून सुनीता चव्हाण यांनी मला लोखंडी घण व दांडक्याने मारहाण केली. यावेळी दुसरी सून सुमित्रा, मुलगा भूपाल व विधवा सून आशा भाऊसाहेब चव्हाण हे मला वाचवायला आल्या असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. त्यांनी एका सुनेच्या अंगावरील साडीही फेडली.
सौ. सुनीता भानुदास चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी गुरुवारी दुपारी नांदगाव येथे घरी आले असता दीर भूपाल, दोन जावा सौ. सुमित्रा, आशा व पुतण्या सुशील भूपाल चव्हाण हे तेथे आले. तुझा येथे काय संबंध नाही. तू आज रात्री येथे थांबलीस तर ती तुझी शेवटची रात्र ठरेल, अशी धमकी देत या सर्वांनी मारहाण केली. भूपालने माझा ब्लाउज फाडला. याबाबत माहिती पतीला व मुलाला फोनवर दिल्यावर ते संध्याकाळी नांदगावला आले. त्यांनी दीर व इतरांना विचारणा केली असता त्या सर्वानी लोखंडी घण, फायबर स्टीक व दांडक्याने आम्हाला मारहाण केली. या मारहाणीत सुशीलच्या डोक्यात गंभीर जखम झाल्याने त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.