मुंबई : कोरोनाचे संकट राज्यासमोर उभे असताना निसर्गाने यात आणखी भर घातली आहे. राज्यातील बळीराजाला अगोदरच कोरोना मुळे नुकसान सहन करावे लागत आहे त्यात हे वादळी वाऱ्यासह पावसाचे अस्मानी संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे.
आधीच कोरोनामुळे नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्याला ऐन पीकं काढणीच्या काळात पावसानं झोडपलं आहे. यामुळे काढणीला आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा यासह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील धुळे, ठाणे, अमरावती, पुणे, सोलापूर,वाशिम, जालना, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागात वादळी वाऱ्यासह पाउस पडला तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीटही झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, हवामा खात्याच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावरून सध्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा होतो आहे. मध्य भारतात कमी दाबाचा पट्टा कार्यरत झाला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही विविध ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाची स्थिती आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यात सर्वच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रातही गारपीट होण्याची शक्यता आहे.