नाशिक: कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटांमुळे कांद्याच्या बाजारभावात आपण चढ-उतार बघितले आहे. मात्र आता करोनाच्या संकटामुळे आशियातील कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच कांद्याच्या बाजारपेठेतील कांदा लिलाव बंद राहणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कांद्याचे बाजारभाव हे शंभरीचा टप्पा ओलांडून गगन भरारी घेणार असल्याची शक्यता आहे.
देशांतर्गत कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर 17 डिसेंबर रोजी लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याने 11 हजार 111 रुपयांचा टप्पा पार केला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने कांद्याची आवक ही मागणीच्या तुलनेपेक्षाही जास्त येण्यास सुरुवात झाली. कांद्याचे बाजारभाव एक हजार ते बाराशे रुपयांपर्यंत खाली आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले.
शेतकऱ्यांनी आंदोलने केल्यानंतर केंद्र सरकारने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कांद्याची निर्यात खुली केली. सर्व निर्बंध हटविले. मात्र, आता करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यसाठी केंद्र सरकारने 21 दिवसांचे लॉकडाऊन घोषित केले. याच पार्श्वभूमीवर लासलगाव बाजार समितीची बैठक झाली.
लासलगाव बाजार समितीच्या बैठकीत व्यापाऱ्यांनी अनिश्चित काळासाठी लिलावात सहभागी होणार नसल्याचे पत्र दिले. त्यामुळे कांदा आणि धान्य लिलाव लॉकडाऊनपर्यंत अनिश्चित काळासाठी बंद राहणार असल्याचे बाजार समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले. या निर्णयामुळे देशात कांद्यांचा तुटवडा निर्माण होऊन कांद्याचे बाजारभाव हे पुन्हा किरकोळ बाजारात गगनाला भिडण्याची शक्यता आहे. पण कांद्याचे आणि धान्याचे लिलाव पूर्ववत कसे करता येईल यासाठी प्रयत्न सुरू राहणार असल्याचे बाजार सामितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले.