वाचाळवीर मियांदादची पाकिस्तानी खेळाडूंवर टीका
कराची – भारतासह अनेक देशांच्या संघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर सातत्याने वर्चस्व राखले आहे, मात्र पाकिस्तानचा संघ त्यात अपयशीच ठरला आहे, कारण सध्याचा पाकिस्तान संघ पाहता एकाही खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची लायकीच नाही, अशा शब्दात पाकिस्तानचे माजी कसोटीपटू व वाचाळवीर जावेद मियांदाद यांनी ताशेरे ओढले आहे.
जर भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड या संघांनी परदेशाच्या एखाद्या खेळाडूला आपल्या संघात घ्यायचे ठरविले तर पाकिस्तानचा एकही खेळाडू संघात स्थान मिळवू शकत नाही. भूतकाळातील सरस कामगिरीच्या आधारे संघातील खेळाडू जागा अडवून बसतात, देशाच्या युवा गुणवत्तेवर हा अन्याय नाही का. व्यावसायिक क्रिकेट खेळणे आजची गरज आहे, मात्र पाकिस्तान क्रिकेट मंडळ वारंवार त्याच त्याच खेळाडूंना निवडते मग संघाची कामगिरी सरस कशी होणार, असे सांगत मियांदाद यांनी मंडळाला घरचा आहेर दिला आहे.
कित्येक वर्षांपासून पाकिस्तान संघाला सातत्याने अव्वल गोलंदाज मिळाले आहेत, मात्र जागतिक क्रिकेटवर वर्चस्व राखेल असा एकही फलंदाज मिळालेला नाही. बाबर आझम आश्वासक आहे मात्र त्याच्याकडे सातत्य नाही.
गेल्या काही वर्षांपासून असे दिसून आले आहे की भारत, इंग्लंड तसेच ऑस्ट्रेलिया या देशांनी आपल्या संघात सातत्यपूर्ण कामगिरीच्याच आधारे संघ निवड केली आहे, मात्र पाकिस्तान संघात काही खेळाडू वर्षानुवर्षे जागा अडवून बसले आहेत, जणू ते मंडळाचे जावईच आहेत, अशा शब्दात मियांदाद यांनी मंडळाला फटकारले आहे.
पाकिस्तानच्या एखाद्या खेळाडूने एखाद्या सामन्यात शतक फटकावले तर त्याला पुढील जवळपास दोन वर्षे संघात सातत्याने घेतले जाते हीच वशिलेबाजी व झुकते माप पाकिस्तानच्या क्रिकेटमधील भविष्यासाठी धोकादायक आहे पण ते मंडळाला कसे समजत नाही याचेही आश्चर्यच वाटते, असेही मियांदाद यांनी स्पष्ट केले आहे.
अचाट उपाय
संघात निवड झालेल्या खेळाडूने जर सरस कामगिरी केली तरच त्याला सामन्याचे मानधन दिले जावे अन्यथा त्याला एक पैसाही देऊ नये. जर मंडळाने असे केले तरच खेळाडूंना त्यांची जबाबदारी लक्षात येईल असा अचाट उपायही मियांदाद यांनी सुचविला आहे.