पुणे – नागरिकत्व दुरूस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तक (एनआरसी) याला उघडपणे केलेला विरोध तसेच रवींद्र जडेजा व हर्षा भोगले यांच्यावर सामन्यादरम्यान केलेली टीकाच संजय मांजरेकर यांना भोवली असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले आहे.
सीएए व एनआरसीविरोधात मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या आंदोलनात सहभागी व्यक्तींना मांजरेकर यांनी उघडपणे पाठिंबा दिला होता. ही एकजूट खूपच परिणामकारक आहे, तुमचे आंदोलन प्रभावी ठरत आहे, असे ट्विट मांजरेकर यांनी केले होते. त्याचवेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळात अध्यक्ष तसेच सदस्य पदासाठी निवडणूक होणार होती. या निवडणुकीत माजी कर्णधार सौरव गांगुली अध्यक्षपदी निवडून आले. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांची मंडळाच्या सचिवपदी नियुक्ती झाली. एकीकडे पक्षाची भूमिका तर दुसरीकडे मंडळातील वर्चस्व अशा परिस्थितीत मांजरेकरांच्या विरोधात चित्र उभे राहिले. त्यातच मांजरेकरांचा इतिहास व त्यांचा फटकळपणादेखील अनेकांना खटकत होता.
सामन्याचे थेट प्रक्षेपण सुरू असताना सहसमालोचक हर्षा भोगले यांचा मांजरेकरांनी अपमान केला होता. इतकेच नाही तर भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याच्यावर देखील त्यांनी टीका केली होती. अर्थात भोगले व जडेजा यांनीही मांजरेकरांवर ताशेरे ओढले होते. मात्र त्याचवेळी मांजरेकर सौरव गांगुलीच्या गुडबुकमध्ये नव्हते, त्यामुळे त्यांची गच्छंती होणार याचे संकेत खूप आधीच मिळाले होते.
सीएए तसेच एनआरसीविरोधात दिल्लीत जेएनयुमध्ये विद्यार्थांनी आंदोलन केले होते. तेव्हा त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात मुंबईतदेखील आंदोलन झाले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्यांना मांजरेकर यांनी उघड पाठिंबा दर्शविला होता. मंडळात जय शहा व गांगुली असताना हे घडले होते, त्यामुळे त्याचे परिणाम मांजरेकर यांना भोगावेच लागणार होते, त्यातूनच त्यांची मंडळाच्या करारबद्ध समालोचकांच्या पथकातून मांजरेकर यांची गच्छंती झाली. मांजरेकर यांची भूमिका तसेच त्यांचा समालोचन करतानाचा फटकळपणाच त्यांना नडला असेही या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
जडेजा, भोगले यांच्यावरच नव्हे तर मांजरेकरांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, टेनिसपटू सानिया मिर्झा, युवराजसिंग यांच्यावर देखील पूर्वी टिप्पणी केली होती. त्यांच्या या स्पष्टवक्तेपणाचे परदेशातील माध्यमांनी जरी कौतुक केले असले तरी मांजरेकर यांना दूर करण्यासाठी मंडळाला भक्कम कारणे मिळाली असेही यातुन स्पष्ट होत आहे.