स्टेट बॅंकेच्या अध्यक्षांचे प्रतिपादन
मुंबई – देशातील वित्तीय क्षेत्रातील स्थैर्यासाठीच स्टेट बॅंकेने येस बॅंकेत गुंतवणूक केली आहे असे स्टेट बॅंकेचे अध्यक्ष रजनीशकुमार यांनी म्हटले आहे. गुंतवणूक करताना नेहमी परतावा पाहिला जातो पण येथे परताव्यावर लक्ष ठेऊन ही गुंतवणूक करण्यात आलेली नाही असेहीं त्यांनी स्पष्ट केले आहे.
केवळ स्टेट बॅंकच नव्हे तर अन्यही बॅंका या साठी एकत्र येत असून आर्थिक स्थैर्य कायम राखण्याच्या उद्देशाने आम्हीं काही निर्णय घेत आहोत असे त्यांनी म्हटले आहे. ते आज येथे पत्रकारांशी बोलत होते. येस बॅंकेत स्टेट बॅंकेने 6050 कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे.
येस बॅंकेत गुंतवणूक करण्यासाठी आयआयसीआय, एचडीएफसी बॅंक, ऍक्सिस बॅंक, बंधन बॅंक, आयडीएफसी बॅंक अशा बॅंकाही पुढे आल्या आहेत. त्या सर्व बॅंकांनी स्टेट बॅंकेशी समन्वय साधून ही गुंतवणूक करण्याचे योजले आहे अशी माहितीहीं त्यांनी दिली. बंधन बॅंक येस बॅंकेत तिनशे कोटी रूपये गुंतवणार आहे तर आयडीएफसी बॅंक 250 कोटी आणि फेडरल बॅंक 350 कोटी रूपये यात गुंतवणार आहे.