सीएपीएच्या अहवालातील निष्कर्ष
नवी दिल्ली – करोना विषाणुंचा सर्वात मोठा फटका विमान क्षेत्राला बसला असून त्यामुळे येत्या मे महिना अखेरपर्यंत जगातील सर्वच विमान कंपन्या दिवाळखोरीत निघण्याची शक्यता आहे असे विमान वाहतूक क्षेत्रातील जागतिक कन्सल्टन्सी संस्था असलेल्या सीएपीएने आपल्या अहवालात म्हटले आहे. सरकार आणि संबंधीत क्षेत्राने या संबंधात वेळीच योग्य समन्वयाने उपाययोजना केल्या नाहींत तर विमान क्षेत्राला कोणीही वाचवू शकणार नाही अशी अभुतपुर्व परिस्थिती येत्या दोन महिन्या उद्भवू शकते असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक कंपन्यांना आपली उड्डाणे स्थगित किंवा बंद करावी लागली आहेत. डेल्टा एअरलाईन्स सारख्या विख्यात विमान कंपनीनेही आपली तिनशे विमाने सध्या जमीनीवरच ठेवली असून त्यांची एकूण विमान उड्डाणे चाळीस टक्क्यांनी कमी करण्यात आली आहेत. अमेरिकेन संपुर्ण युरोपातील नागरीकांसाठी व्हिसा रद्द केले आहेत. भारत सरकारनेही व्हीसा आणि ईव्हीसा रद्द केले आहेत. त्यामुळे विदेशी विमान प्रवाशांची संख्या कमालीची घटली आहे.
जगभरातील ही सारी स्थिती पहाता मे महिन्याच्या अखेरीपर्यंत जगातील बहुतांशी विमान कंपन्या दिवाळखोरीत गेलेल्या असतील असे त्यात म्हटले आहे. ही भीषण स्थिती सावरायची असेल तर सरकारने विमान कंपन्यांशी समन्वयाने उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रवास करू नका असेच सांगण्यावर सर्वांचा भर आहे. त्यामुळे विमान कंपन्यांना प्रवासी मिळणे जवळपास दुरापास्त झाल्याने ही स्थिती कधी सुधारेल याकडे विमान कंपन्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तथापी ही स्थिती इतक्यात सुधारण्याची शक्यता नाही असेच संकेत मिळत असल्याने त्याचा अभुतपुर्व फटका विमान कंपन्यांना बसणार आहे असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.