सोरतापवाडी – दुबई वरून पुण्यात परतल्यानंतर उरूळी कांचन येथे महात्मा गांधी निसर्गोपचार आश्रमात दाखल झालेल्या तिघांना आश्रम व्यवस्थापन व प्राथमिक आरोग्य केंद्राने खबरदारीचा उपाय म्हणून प्रकृती चिकित्सा करण्यासाठी नायडू रुग्णालयाचे वाहन बोलविल्याने उरूळी कांचन परिसरात गेले दोन दिवस करोना रुग्ण आढळल्याचा नाहक संशयकल्लोळ माजला आहे.
उरूळी कांचनच्या महात्मा गांधी निसर्गोपचार आश्रमात दूबईतून नैसर्गिक उपचार घेण्यासाठी एक जोडपे व एक व्यक्ती असे तीन जण 6 व 8 मार्च रोजी आश्रमात दाखल झाले होते. सूरतस्थित जोडपे व मुंबई स्थित व्यक्ती थेट दूबईहून विमानाने प्रवास करून आश्रमात दाखल झाले होते.
तत्पूर्वी त्यांची पुणे विमानतळावर “करोना’बाधितची “थर्मल’ तपासणी घेण्यात आली होती. या चाचणीत तिघे जण निगेटिव्ह आढळल्याने या तिघांना आश्रम व्यवस्थापनाने नैसर्गिक उपचारास प्रवेश दिला होता.
त्यानंतर अशाच एका प्रकारात दुबईहून परतलेल्या व थर्मल तपासणी निगेटिव्ह आढळलेल्या पुण्यातील 5 जणांना करोना आजाराचा संसर्ग आढळल्याचे प्रशासनाने जाहीर केल्याने आश्रम व्यवस्थापन व प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी खबरदारी म्हणून या तिघांना दुबईहून आलेल्या प्रवाशांना पुण्यातील नायडू रुग्णालयात प्रकृती चिकित्सा करावी म्हणून सूचना केली होती.
तसेच व्यवस्थापनाने पुण्यातील नायडू रुग्णालयाशी संपर्क साधून या रहिवाशांची चिकित्सा करण्यासाठी विनंती केल्याने नायडू रुग्णालयाने तातडीने या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी आश्रमात रुग्णवाहिका पाठविली.
सावधगिरीचा उपाय म्हणून आम्ही तिघांना नायडू रुग्णालयात तपासणी करण्यास सांगितले असून त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.
– प्रवीण कुंभार, व्यवस्थापक महात्मा गांधी निसर्गोपचार आश्रम