साताऱ्यातील अतिक्रमणधारकांना राहिला नाही प्रशासनाचा धाक
सातारा (प्रतिनिधी) – मुळातच अरुंद रस्ते आणि त्यातही रस्त्याकडेला होत असलेली अतिक्रमणे यामुळे शहरातील वाहतुकीचा नेहमीच बोजवारा उडत असतो. विशेष म्हणजे पालिका प्रशसनाकडून अधूनमधून अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाते. परंतु, काही काळ गेल्यानंतर पुन्हा आहे ती अतिक्रमणे आहे त्या ठिकाणी पहावयास मिळतात. नुकतीच पालिका प्रशासनाने नेहमीसारखी अतिक्रमण हटावची धडक मोहीम राबविली, आणि नेहमीसारखीच अतिक्रमण धारकांनी काही काळ जाऊन देत पुन्हा अतिक्रमणे करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांना प्रशासनाचा कसला धाक राहिलेला नाही हेच स्पष्ट होत आहे.
गत आठ पंधरा दिवसांपूर्वी पालिका प्रशासनाने सातारा शहरात धडक मोहीम राबवत जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणे हटविली. त्यामुळे शहरातील रस्त्यांनीही मोकळा श्वास घेतला होता. अतिक्रमणांमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी झाल्यामुळे वाहतुकीचाही बराचसा ताण कमी झाला होता. नेहमीपेक्षा कडक राबविलेल्या या मोहिमेमुळे अतिक्रमणांपासून कायमची सुटका मिळेल, अशी आशा सातारकरांना होती. परंतु, काही दिवसांचा अवधी जाताच आता पुन्हा अतिक्रमण धारकांनी आपल्या आहे त्याठिकाणी अतिक्रमणे करुन आपले व्यवसाय थाटले आहेत. त्यामुळे शहरातील अतिक्रमणे पुन्हा “जैसे थे’ दिसत आहेत. विशेष म्हणजे अतिक्रमण करत असतानाच संबंधिताला रोखणे गरजेचे आहे. परंतु, तसे होत नाही. आणि पुन्हा काही लगेच अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात नाही. त्यामुळे अतिक्रमण धारकांचेही धैर्य दिवसेंदिवस वाढत आहे.
अतिक्रमणांना मिळतय राजकीय पाठबळ?
शहरात आजवर अनेका अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. मात्र, आजही ही अतिक्रमणे आहे तशीच, आहे त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे मोहिमेपुरती अतिक्रमणे काढा आणि पुन्हा काही दिवस गेल्यावर आपापले व्यवसाय थाटा, असेच समीकरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने कारवाई करुन काढलेले अतिक्रमण पुन्हा धाटण्याचे धाडस अतिक्रमणधारकांमध्ये येतेच कुठून? असा सवाल सर्वसामान्या सातारकरांना पडला असून या अतिक्रमण धारकांना राजकीय पाठबळ मिळत असल्याचेही सातारकरांमधून बोलले जात आहे.