कलबुर्गी : खूप उशीर होईपर्यंत कोणी माझ्या वडीलांना कोरोनाची लागण झाली असल्याची शंका बोलूनही दाखवली नव्हती, असा दवा कोरोनाने मरण पावलेल्या कलबुर्गीमधील व्यक्तीच्या मुलाने केला आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारच्या आरोग्य विभागाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
माझे कुटुंबीय आणि लहान मुलेही त्यांच्या आजारी आजोबांना पाहण्यासाठी रुग्णालयात येत असत. मी आमच्या कुटुंबियांचे आरोग्य कशाला धोक्यात घातले असते? असा दावा त्यांनी केला.कलबुर्गीमधील एका 76 वर्षीय वृध्दाचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे कर्नाटक सरकारने मंगळवारी जाहीर केले. ही व्यक्ती मक्केहून 29 फेब्रुवारी रोजी हैदराबाद विमानतळावर उतरली होती.
सहा मार्च रोजी ते आजारी पडले. त्यावेळी त्यांच्या फॅमिली डॉक्टरने त्यांच्यावर उपचार केले. मात्र आठ मार्च रोजी त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना कलबुर्गी येथील रुग्णालयात दाखल केले. कर्नाटक सरकारने, त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना विलगता कक्षात ठेवण्याचा सल्ला न पाळता त्यांना हैदराबादला हलवल्याचा आरोप केला होता.
त्यांच्या मुलाने हा आरोप फेटाळून लावला. ते म्हणाले, आम्हाला डॉक्टरांनी कोरोनाची लागण झाली असल्याची शक्यता व्यक्तही केली नव्हती. त्यांच्या प्रकृतीच्या अनेक तक्रारी होत्या. त्यातूनच त्यांची प्रकृती खालावली असावी, असे आम्हाला वाटले. मी, माझी बहीण आणि मेव्हणे यांनी त्यांना सनराईज रुग्णालयात दाखल केले. तेंव्हा कोणीही कोरोना हा शब्द उच्चारला नाही. त्यांना गुलबर्गी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये त्यांना हलवल्यानंतर आम्हाला त्यांना बाधा झाली असावी, अशी जाणीव झाली. आम्ही डॉक्टरांना ते सौदीतून आले असल्याचे सांगितले होते.
वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना विलगता कक्षात हलवण्यात आले आहे. मात्र तेथे स्वच्छतेचा अभाव असल्याचा आरोप त्यांनी केला.