-माधव विद्वांस
मराठी भाषेत “गझल’ हा काव्यप्रकार रुजविणारे सुरेश भट यांचे आज पुण्यस्मरण.त्यांचा जन्म 15 एप्रिल 1932 रोजी अमरावती येथे झाला. त्यांना गझल सम्राट असे संबोधले जाते. त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला कवितांचा खूप नाद होता. त्यांच्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली.
अगदी लहानपणीच त्यांचा उजवा पाय पोलिओमुळे अधू झाला होता. त्यांचा एक पाय कमजोर झाल्यावर त्यांनी व्यायामावर जोर देऊन शरीर मजबूत बनवले. त्यांचे अपंगत्व लक्षात घेऊन त्यांच्या आईने त्यांना बाजाची पेटी आणली होती. त्यांना संगीताची गोडी आईने लावली होती. त्यांचे वडीलही संगीतप्रेमी होते. मुलाची आवड पाहून आठवड्यातून ते एक तरी ध्वनिमुद्रिका विकत आणत. सुरेश भट उत्तम बासरी वाजवीत. त्यांना रीतसर संगीत शिक्षण द्यायचे ठरविले आणि प्रल्हादबुवा या संगीत शिक्षकाची घरी येऊन शिकविण्यासाठी नेमणूक केली. संगीत आणि काव्य असा जोडीने प्रवास सुरू झाला.
त्यांचे सर्व शिक्षण अमरावती येथे झाले.वर्ष 1955 मध्ये पदवी परीक्षा पास झाल्यावर शिक्षक म्हणून काम करू लागले. नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते. एल्गार, काफला, झंझावात, रंग माझा वेगळा, रसवंतीचा मुजरा, रूपगंधा, सप्तरंग हे त्यांचे गाजलेले काव्यसंग्रह. त्यांच्या खासगी आयुष्यात, पूर्वीच्या आयुष्यात त्यांनी जे सहन केले त्याचे प्रतिबिंब साहजिकच त्यांच्या कवितेत उमटले व त्या कविता भावस्पर्शी झाल्या.
एकदा हृदयनाथ मंगेशकरांना त्यांनी लिहिलेल्या कवितांचे एक चोपडे एका फुटपाथवर सापडले. त्यातील कविता वाचून त्यांनी सुरेश भटांना शोधून काढले आणि त्यांच्या कवितांना चाली लावल्या. तेव्हापासून सुरेश भट आणि हृदयनाथ मंगेशकर एक जोडी होऊन गेली. “गझल’ हा एक प्राचीन इराणमधील काव्यप्रकार व गायनप्रकारही आहे. सुफी संतांकडून भारतीय संगीतास मिळालेली ही देणगी. अमृतराय हे (वर्ष 1729) मराठीतील पहिले गझल लेखक.त्यानंतरच्या काळात माधव ज्युलियन यांनी वर्ष 1925 ते 1934 या काळात अनेक गझला लिहिल्या.मात्र खरी उर्जितावस्था मराठी गझल प्रकारास सुरेश भट यांच्या लेखनातून मिळाली. ते स्वतः कवी, गायक असल्याने त्यांच्या रचनेत वेगळीच खुमारी आली. त्यामुळे गझल हा प्रकार मराठीत खूप लोकप्रिय झाला.
उंबरठा, सिहासन, निवडुंग यातील अनेक गाणी व त्यामुळे चित्रपटही लोकप्रिय झाले. “केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली’ हे निवडुंग चित्रपटातील त्यांचे गाणे हृदयनाथ मंगेशकरांनी दुर्गारागात संगीतबद्ध केले व पद्मजा फेणाणी यांनी गायले. “सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’ हे पथदीप रागातील “उंबरठा’ चित्रपटातील हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेले लता मंगेशकर यांनी गायलेले हे गीत. सुरेश भट यांनी विरक्तीमुळे अखेरच्या आयुष्यात बौद्ध धर्म स्वीकारला होता. 14 मार्च 2003 रोजी सुरेश भट यांचे हृदयविकारामुळे निधन झाले.