राजकोट – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी सौराष्ट्र आणि बंगाल यांच्यात अंतिम लढत होणार आहे. हा सामना येत्या सोमवारपासून येथे सुरू होत आहे. भारतीय संघाकडून खेळणारा अष्टपैलू रवींद्र जडेजा याने या सामन्यात सौराष्ट्र संघात परतण्याची मागितलेली परवानगी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नाकारली आहे.
बंगालचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा या सामन्यात खेळणार आहे. तसेच चेतेश्वर पुजारादेखील सौराष्ट्र संघात परतला आहे, मग आपल्यालाही हा सामना खेळण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी जडेजाने केली होती मात्र, मंडलाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी त्याला मनाई केली आहे. हा सामना 9 ते 13 या कालावधीत होत असून त्याचदरम्यान भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यात व्यस्त होत आहे.
या मालिकेतील पहिला सामना 12 तारखेला होत असून त्यात जडेजाचा भारतीय संघात समावेश असल्याने त्याला रणजी सामन्यात खेळण्याची परवानगी देता येणार नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. रणजी करंडक सामन्याला गौण समजत नसून जडेजा देशाकडून खेळणार असल्याने देशाचे प्रतिनिधित्व करणेदेखील जास्त महत्त्वाचे आहे, असे मंडळाने वर्तविले आहे.