सातारा – सातारा पालिकेने मिळकत कर व पाणीपट्टी वसुलीचा मार्च एंडचा दणका सुरू केला आहे. शहरातील थकबाकीदारांना वॉरंट बजावण्याची व मिळकती सील करण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे. वसुली विभागाने गेल्या चाळीस दिवसांत 11 कोटी तर गेल्या सहा दिवसांत 80 लाख रुपयांची करवसुली केली आहेत.
वसुली होत नसल्याने पुन्हा नोटिसा
स्थावर जिंदगी विभागाने 318 गाळेधारकांना नोटिसा बजावल्या आहे. करंजे येथील 58 भूखंडांची मुदत संपल्याने संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. मात्र, वसुली होत नसल्याने पुन्हा नोटिसा देण्यात येणार आहेत. गाळे व भूखंड ताब्यात घेण्याची तयारी स्थावर जिंदगी विभागाने केली असून याबाबतची टिप्पणी मुख्याधिकाऱ्यांसमोर ठेवण्यात आली आहे. कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली जाणार आहे.
यंदा 27 कोटी रुपयांच्या करवसुलीचे उद्दिष्ट असून मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या आदेशानुसार विभागप्रमुख अरविंद दामले यांनी दहा कर्मचाऱ्यांचे वसुली पथक नेमले आहे. हे पथक शहराचा पूर्व व पश्चिम भाग पिंजून काढत आहे. मल्हार पेठ, भवानी पेठ, सदाशिव पेठ, बुधवार पेठ, करंजे या भागात वसुलीचे प्रमाण 25 टक्क्यांपेक्षा कमी असल्याने तेथील वसुलीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहेत.
दिवसाला सरासरी 15 ते 18 लाखांची वसुली होत असून वसुली विभागाने गेल्या सव्वा महिन्यात दहा कोटी 65 लाख रुपये वसुली केली आहे. वसुलीचे प्रमाण सध्या तरी 83 टक्के असल्याचे सूत्रांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात 110 मिळकतधारकांना वॉरंट बजावण्यात आले होते. आता जप्तीची कारवाई सुरू झाली आहे. पालिकेच्या मालकीच्या गाळ्यांचे भाडे वसूल करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. पालिकेच्या सहा व्यापारी संकुलांमधील पाच गाळे सील करण्यात आले आहेत. सकाळी आठ ते दोन आणि दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत करवसुली करण्यात येत आहे.
बड्या व्यावसायिकाची 63 लाख थकबाकी
शहरातील बडी धेंडे वसुली विभागाच्या रडारवर आहेत. पोवई नाक्यावरील एका बड्या व्यावसायिकाची 63 लाख रुपयांचा कर थकीत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून साडेतीन कोटी रुपये येणे आहे तर पालिकेच्याच शिक्षण मंडळाची थकबाकी एक कोटीच्या घरात आहेत. बड्या धेंडांकडून करवसुली करताना वसुली विभागाला राजकीय हस्तक्षेपाचा सामना करावा लागत असला तरी 15 मार्चपासून बड्या धेंडांवर कारवाई करण्यात येणार आहेत.