समुद्रतळाचे पाणबुडीतून होणार दर्शन
अवैध मासेमारी रोखण्यासाठी कायदा करणार
मुंबई (प्रतिनिधी) – कोकणचं निसर्ग सौंदर्य जपून त्याचं वैभव जगासमोर आणणार, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली. इथला समृद्ध निसर्ग घालवून जर येथे कृत्रिम प्रकल्प आणले तर त्यासारखे दुसरे वैचारिक दारिद्रय नाही. त्यामुळे कोकणचा कॅलिफोर्निया नव्हे, तर कॅलिफार्नियाला आपला कोकण व्हावं असं वाटलं पाहिजे, असे सांगतानाच एलईडी लाईटद्वारे होणारी मासेमारी रोखण्याकरिता राज्याचा कायदा लवकरात लवकर करण्यात येईल. तसेच पाणबुडीतून समुद्रतळाचे दर्शन, जलदुर्गांची सफर यासारख्या प्रकल्पांतून पर्यटनाचा विस्तार करण्याची स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली.
विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या वतीने नियम 293 अन्वये कोकणच्या विकासाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, कोकणात मोठ्या प्रमाणावर ज्याप्रमाणे पारंपरिक मासेमारी केली जाते, त्याप्रमाणेच अपारंपरिक मासेमारीही केली जात आहे. यात एलईडीद्वारे मासेमारीचे प्रकार वाढले आहेत.
या एलईडी लाइटवर बंदी आणण्यासाठी हे सरकार प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी कायदा करणार आहे. तसेच सरकारने डिझेल परताव्याचे पैसे द्यायला सुरुवात केली असल्याची माहितीही त्यांनी दिली. समुद्री महामार्गाचं काम जलदगतीने पुढे नेत आहोत. जिथे आवश्यक तिथे सिमेंट कॉंक्रीटचे रस्तेही तयार केले जातील. कोकणमध्ये पंतप्रधान योजनेतून जल मिशन योजना बंद केलेली नाही. या योजनेत असलेली लोकसंख्येची अट काढून टाकण्यात येणार असून प्रत्येक घणात नळाद्वारे पाणी देऊ, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.
1 मेपासून चिपी विमानतळ कार्यान्वित
कोकणचा किनारपट्टा म्हणजे पर्यटन. या पर्यटनाचा विस्तार करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. येथील चिपी विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांत उपकरणं लावल्यानंतर चाचणी वगैरे होऊन 1 मे या संयुक्त महाराष्ट्र दिनी कोणत्याही परिस्थितीत विमानतळ सुरू करू, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.
गोव्यापेक्षा निळाशार समुद्र कोकणाला लाभला आहे. पर्यटकांसाठी ज्या गोष्टी अंडरवॉटर मरीनलाइफ दाखविण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. यासाठी पाणबुडीच्या माध्यमातून समुद्र सौंदर्याचे दर्शन लोकांना देण्याची योजना सरकार आखत आहे. त्याचप्रमाणे एलिफंटापासून कोकणपर्यंत असलेल्या जलदुर्गांचे दर्शन घडविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.