“मेहेरबानांशी’ बोलताय का? नगरसेवकांचा हस्तक्षेप पुन्हा स्पष्ट
अतिक्रमण हटाव मोहिमेत हस्तक्षेप करणाऱ्यांची यादी सादर करा, अशी मागणी सातारा विकास आघाडीचे पक्षप्रतोद निशांत पाटील यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली होती, तरीही आरटीओ चौकातल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत काही नगरसेवकांनी डोके घालण्याचा प्रयत्न केलाच. एका टपरीचालकाने चक्क एका नगरसेवकालाच सुनावले. अतिक्रमण हटाव मोहिमेत पालिकेच्या पथकाला सातत्याने राजकीय दबावाचा सामना करावा लागत आहे.
शाहूनगर व कामाठीपुरा परिसरात सध्या दिसेल त्या मोकळ्या जागेत टपऱ्या टाकायचा होलसेल धंदा सुरू आहे. अतिक्रमणे करणाऱ्या काही जणांनी एक टपरी एसटी कॉलनीलगतच्या (शाहूनगर) वर्दळीच्या रस्त्यावर आणून ठेवली होती. हे अतिक्रमण पालिकेने तात्काळ हटवले. काही दिवस टपरी बंद ठेवून ती पुन्हा सुरू करण्याचा संबंधिताचा बेत होता. मात्र, अचानक झालेल्या कारवाईमुळे हा बेत फसला. त्यानंतर दोन-तीन युवक आज सकाळी पालिकेच्या शहर विकास विभागात दाखल झाले आणि टपरी परत करा, असे सांगितले.
“मेहेरबानांशी बोलताय का?’ अशी अरेरावीची भाषा त्या युवकांनी केली. त्यावर, तुम्ही ज्या ठिकाणी अतिक्रमण केले होते, त्या रस्त्यालगतच्या कॉलनीतच मी राहतो, असे निरीक्षकांनी सांगितल्यावर युवक गोंधळले. राजकीय दबाव टाकण्याची खेळी त्यांनी केली. खंडोबाचा माळ परिसरातील सातारा चिकन सेंटरचे अतिक्रमण काढताना अशाच राजकीय दबावाचा सामना पालिकेच्या पथकाला करावा लागला होता. तेथील मोकळी जागा अद्यापही पालिकेच्या ताब्यात आलेली नाही.
सातारा – शहरातील फूटपाथ, रस्ता किंवा मोकळी जागा प्रत्येक ठिकाणी अतिक्रमणे करून शहराच्या नियोजनाची वाट लावणाऱ्यांची टगेगिरी भलतीच वाढली आहे. अतिक्रमणविरोधी पथकाने कामाठीपुरा परिसरातून शनिवारी (दि. 29 फेब्रुवारी) रात्री उचललेली टपरी परत घेण्यासाठी आज पालिकेच्या शहर विकास विभागात आलेल्या युवकांनी, “मेहेरबानांशी बोलताय का?’ असे सांगितल्याने अतिक्रमण हटाव मोहिमेतील नगरसेवकांचा हस्तक्षेप पुन्हा स्पष्ट झाला आहे. मात्र, तुमचे म्हणणे मुख्याधिकाऱ्यांना सांगा, असे म्हणत अतिक्रमण विरोधी पथकाच्या निरीक्षकांनी संबधित युवकांना पिटाळले.
कराड शहरातील धडाकेबाज मोहिमेमुळे तेथील पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे हिरो ठरले. मात्र, साताऱ्याचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांना प्रशासकीय कार्यक्षमता, कर्तव्यकठोरता आणि निर्धार अद्याप दाखवता आलेला नाही. कराडमधील लोकप्रतिनिधींनी दाखवलेली राजकीय इच्छाशक्ती साताऱ्यातील लोकप्रतिनिधींकडे नाही आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांच्या हस्तक्षेपामुळे साताऱ्यातील अतिक्रमण हटाव मोहिमेचे वाटोळे झाले आहे.