पाच दिवसांच्या आठवड्यानंतर कामाच्या वेळेत बदल
सातारा – राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा ही संकल्पना लागू केल्यामुळे आता शासकीय कर्मचाऱ्यांना शनिवारी आणि रविवार अशी दोन दिवस सलग सुट्टी असणार आहे. या योजनेची अंमलबजावणी शनिवारपासून झाली असून सोमवारी पहिल्याच दिवशी मात्र अनेक कर्मचारी आपल्या कार्यालयात उशिरा दाखल झाल्याचे चित्र जिल्हा परिषदेत दिसून आले. वास्तविक कामाच्या पाच दिवसांमध्ये कामाची वेळ वाढवण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांनी वेळेवर कार्यालयात हजर असणे अपेक्षित आहे. मात्र, पहिल्याच दिवशी “लेट कमर्स’ची संख्या लक्षणीय होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाकडून कडक शिस्तीची गरज आहे.
कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी व्हावा, यासाठी राज्य शासनाने विविध उपक्रम राबवले आहेत. त्याचाच भाग म्हणून पाच दिवसांचा आठवडा ही संकल्पना अंमलात आणली. शनिवारपासून (दि. 29) त्याबाबत अंमलबजावणी करण्यात आली. ही संकल्पना राबवत असताना कामाच्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत कर्मचारी कार्यालयात दाखल होवून पावणेदहा वाजता प्रत्यक्षात काम सुरु होणे अपेक्षित आहे.
मात्र, सोमवारी पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या विविध विभागात “लेट कमर्स’ कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.15 अशी आता नवीन कामकाजाची वेळ असणार आहे. दुपारी जेवणाची वेळही काटेकोरपणे पालन करण्याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. लेट कमर्स कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचेही मोठे आव्हान प्रशासनापुढे असून प्रशासन याबाबत काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.