मुंबई: मराठी ही देशात तिसरी आणि जगात दहावी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा!
भाषा ही केवळ भाषा नसते, तो संस्कृतीचा आरसा. भाषा जपता आली, तर संस्कृतीवर कुणीही आक्रमण करू शकत नाही, म्हणूनच भाषेचे महत्त्व हे फार मोठे असल्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 1924 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मराठी भाषेच्या शुद्धीकरणाचा स्तंभ केसरी या दैनिकातून सुरू केला. कितीतरी मोठी शब्दसंपदा त्यांनी मराठी भाषेला दिली. मराठी भाषेवरील अन्य भाषिक अतिक्रमण दूर करण्याचे काम स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केले. देशातील एकूण वाचनालयांपैकी 25 टक्के वाचनालय ही महाराष्ट्रात आहेत. मराठीला विपुल ग्रंथसंपदा लाभलेली आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी गेल्या 5 वर्षांत मोठे प्रयत्न झाले. काही न्यायिक अडचणी होत्या. केंद्र सरकारच्या समितीतील 2 पदे रिक्त होती. त्या आता दूर झाल्या आहेत. रिद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ निर्माण व्हावे, यासाठी एक समिती आपल्या सरकारच्या काळात गठीत करण्यात आली होती. त्या कामाला नवीन सरकारने गती द्यावी, अशी अपेक्षाही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
एवढ्या मोठ्या प्रमाणात संतसाहित्य उपलब्ध असण्याचा मान केवळ मराठी भाषेलाच आहे. मराठी ही माहिती-तंत्रज्ञानाची सुद्धा भाषा व्हावी, ती ज्ञानभाषा व्हावी, याचा सुद्धा विचार आपल्याला करावा लागेल. मूल्याधिष्ठीत व्यवसायात मराठीची सुप्रतिष्ठा करावी लागेल. मराठी सक्तीचा कायदा करतो आहोत, ही आनंदाची बाब आहे. पण, तो अंमलात आणण्याची व्यवस्था उभी करावी लागेल. मराठी सक्तीच्या कायद्यात पळवाट राहू नये. आहे त्या स्वरूपात या कायद्याला मंजुरी देण्याची आमची तयारी आहे. पण, त्याचा फायदा होणार नाही. यातील त्रुटी दूर करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात यावी. चांगले उपकरण तयार झाले तरच या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी शक्य आहे. त्याची काळजी सरकारने घ्यावी, असे मत फडणवीसांनी व्यक्त केले.