आकड्यांच्या खेळात सातारा पालिकेच्या महसुली सेवा तोट्यात
सातारा – शहराचे 212 कोटीचे अंदाजपत्रक मांडताना सत्ताधाऱ्यांनी “सर्वसमावेशक बजेट’ म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेतली. उपनगराध्यक्षांच्या भाषणात अंदाजपत्रकाचे वस्तुनिष्ठ प्रतिबिंब उमटले नाही. चतुर्थ वार्षिक पाहणीच्या तांत्रिक अडचणी सांगत मुख्याधिकाऱ्यांनी पुन्हा वेळ मारून नेली. तर हे अंदाजपत्रक म्हणजे फुगवलेल्या आकड्यांचा खेळ आहे, अशी टीका अशोक मोने यांनी केली.
अंदाजपत्रकात मांडलेल्या आकड्यांच्या खेळात महसुली सेवा तोट्यात आल्याचे स्पष्ट झाले असून पाणीपट्टीच्या जुन्या सॉफ्टवेअरमुळे वसुलीची अडचण झाली आहे. त्यातच 27 कोटींच्या थकबाकीवर पालिकेला उपाय सापडेना, अशी स्थिती आहे.
सातारा पालिकेची अंदाजपत्रकीय विशेष सभा छत्रपती शिवाजी सभागृहात आज झाली.
पाणीपट्टी वसुलीत जुन्या सॉफटवेअरमुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे ते बदलण्याची तरतूद अंदाजपत्रकात करावी, असे पत्र भाजपच्या गटनेत्या सिद्धी पवार यांनी सादर केले. सभेच्या सुरवातीला स्थायी समितीने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकीय तरतुदी लेखापाल हिम्मत पाटील यांनी वाचून दाखवल्या.
त्यानंतर उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी भाषण केले. वेगवेगळ्या पुरस्कारांसाठी आर्थिक तरतूद, पालिका शाळांचा दर्जा वाढवणे, सदस्यांचा वॉर्ड निधी, विविध विकासकामांसाठी निर्धारीत करण्यात आलेला निधी, वृक्ष लागवड, अमृत योजना, पाच टक्के दिव्यांग निधी, शहराचा वाहतूक आराखडा, सीसीटीव्ही कॅमेरे, दिशादर्शक डिजिटल फलक आदी मोठ्या योजनांसाठी करण्यात आलेल्या तरतुदींचा आढावा उपनगराध्यक्षांनी घेतला.
शंभर टक्के करवसुली, मोकळ्या जागा व गाळ्यांचे फेरलिलाव, भाडेवाढ व अनामत वाढवणे आदी माध्यमातून पालिकेने उत्पन्न वाढवण्याची ग्वाही किशोर शिंदे यांनी दिली. मात्र, हे बजेट म्हणजे फुगवलेल्या आकड्यांचा खेळ आहे, असा आरोप अशोक मोने यांनी केला. महसुली रक्कम 16 कोटी, त्यात थकबाकी 27 कोटी, प्राधिकरणाला पालिकेने 61 कोटी रुपये द्यायचे आहेत, त्याचा बजेटमध्ये उल्लेख नाही. चतुर्थ वार्षिक पाहणी झालेली नाही. वसुली 28 टक्क्यांवर आल्याचे सांगत मोने यांनी बजेटच्या आकड्यांची हवा काढली. स्वतंत्रपणे आकारण्यात येणाऱ्या पाणीपट्टीवर शास्ती लावता येते का, असा प्रश्न वसंत लेवे यांनी विचारला. पाणीपट्टीचे सॉफ्टवेअर अपडेट करा, त्यामुळे वसुली होत नाही.
जुन्या सॉफटवेअरची अडचण किती दिवस सांगणार, असा हल्लाबोल सिद्धी पवार यांनी केला. अतिक्रमण हटाव मोहिम व अग्निशमन केंद्र या विषयावर निशांत पाटील यांनी भाष्य केले. अजिंक्यतारा किल्ल्याच्या मार्गावरील पथदिव्यांची जोडणी करण्याची मागणी शेखर मोरे यांनी केली. नगरसेवकांनी बालिश चर्चा केल्याने ही नगरपालिकेची अंदाजपत्रकाची विशेष सभा होती की नेहमीसारखी सर्वसाधारण सभा होती, हेच समजत नव्हते. बजेटमधील तरतुदींसंदर्भात कोणत्याही सदस्याने अभ्यासपूर्ण विवेचन केले नाही.
पार्किंग जागा विकसन, जन्माचा मोफत दाखला, गणेश विसर्जनासाठी कायमस्वरूपी जागा, अंत्यसंस्कारासाठी चार हजार रुपये अनुदान, हॉकर्स झोन विस्तारीकरणं आदी जुजबी विषय मांडून बजेट एकमताने मंजूर करण्याचे आवाहन ऍड. दत्ता बनकर यांनी केले. दीड तासाच्या चर्चेनंतर सर्व सदस्यांनी हात उंचावून बजेटला मंजुरी दिली.
नगरसेवकांचा जेमतेम अभ्यास
पाणी पुरवठ्यासाठी 5 कोटी 85 लाख रुपये जादा खर्च झाल्याची बाब समोर आली असून ही सेवा 140.85 टक्के तुटीत असल्याचे बजेटमध्ये म्हटले आहे. दिवाबत्तीच्या सेवेवर 68 लाख 90 हजार रुपये खर्च झाला असून ही सेवा 55.86 टक्के तुटीत आहे. साफसफाई सेवेवर तब्बल नऊ कोटी 43 लाख रुपये जादा खर्च झाला असून ही सेवा 404.64 टक्के तुटीत आहे.
या संदर्भात एकाही नगरसेवकाने “ब्र’ शब्दही उच्चारला नाही. ज्या सेवांमधून पालिकेला महसूल मिळतो, त्या सेवा गैरव्यवस्थापनामुळे तोट्यात असतानाही त्यावर चर्चाच झाली नाही. त्यामुळेच नगरसेवकांचा अंदाजपत्रकाचा अभ्यास जेमतेम असल्याचे स्पष्ट झाले आहे.