गृहमंत्री अनिल देशमुख देणार आंध्र प्रदेशला भेट
मुंबई : राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराची उद्धव ठाकरे सरकारने गंभीर दखल घेतली असून हल्लेखोरांना कायद्याची जरब बसावी यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. महिलांवरील अत्याचारांविषयी राज्यात कठोर कायदा केला जाणार आहे. त्यासाठी आंध्र प्रदेशने केलेल्या “दिशा’ कायद्याची माहिती घेण्यासाठी स्वतः गृहमंत्री गुरुवारी, 20 फेब्रुवारी रोजी हैद्राबादला जाणार आहोत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली.
राज्यात हिंगणघाट, औरंगाबाद येथे महिलांवर ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती. अशा हल्लेखोरांना तातडीने फाशी द्यावी, अशी समाजातून मागणी जोर धरू लागली होती. त्या पार्श्वभूमिवर अशा हल्लेखोरांना कायद्याचा धाक बसावा यासाठी आगामी अर्थसंकल्पिय अधिवेशनात कायदा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे जलद गतीने चालवून अशा घटनांमधील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी उपाययोजना करण्यास शासन प्राधान्य देत आहे. त्यासाठी प्रभावी ठरेल असा नवीन कायदा आणण्याचा विचार करत आहोत, असे देशमुख यांनी सांगितले.
महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे जलद गतीने चालवून निकाल मिळण्यासाठी आंध्र प्रदेशने केलेला “दिशा’ कायदा प्रभावी ठरेल. त्याअनुषंगाने प्रत्यक्ष हैद्राबादला जाऊन आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच पोलीस महासंचालक कार्यालयाला भेट देऊन या कायद्याची सविस्तर माहिती घेणार आहे, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.
गृहमंत्र्यांसमवेत गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, महिला व बालकांवरील अत्याचार प्रतिबंध विभागाचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या अस्वती दोर्जे यांचा समावेश असणार आहे.