गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलाखतीदरम्यान खुलासा
नागपूरचा “क्राइम कॅपिटल’चा डाग धुऊन काढणार
पुणे – “महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या नागपूर अधिवेशनावेळीच राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मला कोणते पद हवे, याबाबत विचारणा केली होती. त्यावेळी मी अन्न व नागरी पुरवठा विभाग सोडून इतर कोणताही विभाग चालेल असे सांगितले. त्यानंतर पवार यांनी तुला गृहखाते देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे गृहमंत्रिपद मला मिळणार हे आमचं आधीच ठरलं होतं,’ अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी दिली.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे यांच्यातर्फे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी प्रकट संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी देशमुख यांच्याशी संवाद साधला. मुलाखतीदरम्यान भावे यांनी देशमुख यांना गृहमंत्रीपद मिळणार, ही माहिती आपणच त्यांना दिली होती असे सांगितले. तसेच हे पद मिळाल्यानंतर तुम्हाला काय वाटले? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देत देशमुख बोलत होते.
देशमुख म्हणाले, “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री-गृहमंत्री झाल्यानंतर नागपूरमधील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यांच्याकडे गृहखातेही होते तरीदेखील नागपूरमधील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले. “क्राइम कॅपिटल’ अशी ओळख या शहराला मिळाली. नागपूर शहरावर लागलेला हा “क्राइम कॅपिटल’चा डाग धुवून काढणार.’
मागणी झाली, तर पुण्यातही नाइट लाइफ
मुंबईत नाइट लाइफ हा एक प्रयोग आहे. यातून मुंबई शहरातील हॉटेल्स, मॉल्स, विविध कंपन्या, कारखाने यांना 24 तास काम सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र, यातून त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. नाइट लाइफ म्हणजे दारू पिऊन धिंगाणा घालणे नव्हे, असा काही गैरप्रकार घडल्यास त्यावर योग्य कारवाई पोलिसांमार्फत केली जाईल. तसेच हा प्रयोग यशस्वी झाला आणि पुण्यातूनही यासाठी मागणी झाल्यास त्याबाबत नक्की विचार करणार, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.