शंकर दुपारगुडे
कोपरगाव – जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासुन डेंग्यूसदृश्य आजाराने डिसेंबरपर्यंत नागरीक मेटाकुटीला आले होते. सर्व रुग्णालय हाऊसफुल सिनेमागृहाप्रमाणे खचा खच भरलेले होते. काही रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने जमिनीवर गादी टाकुन उपचार घेण्याची वेळ आली होती. या दरम्यान काही रुग्ण दगावले. डेंग्यूची लागण कमी झाली आणि आता खोकल्याने बेजार केले आहे. पुर्वी हिवाळ्यात सर्दी-खोकला होतो पण यावर्षीचा हिवाळी खोकल्याने नागरीकांना बेजार केले आहे.
दोन ते चार दिवसात बरा होणारा खोकला सध्या अनेक प्रकारचे औषधे, विविध प्रकारचे आयुर्वेदिक काडे, जडीबोटी घेवूनही बरा होत नाही. यामुळे नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या सर्वसामान्य नागरिकांचाच खोकला लवकर बरा होत नाही असे नाही तर डॉक्टरांच्या परिवाराला खोकल्याची लागन झाली आहे. तेही अनेक दिवसांपासुन उपचार घेवून वैतागले. खोकल्याचा ठसका धम धरत नाही. त्यामुळे नव्याने सुरु झालेल्या खोकल्याच्या साथीने कोपरगावकरांची चिंता वाढली आहे.
चीनमध्ये कोरोनाचे थैमान सुरू आहे. त्यात शेकडो नागरीक दगावत आहेत. त्याच्या भितीने जगाची झोप उडाली असताना आता कोपरगाव तालुक्यात खोकल्याच्या ठसक्याने सर्वांची झोप उडाली आहे. औषधाचे ढोसावर ढोस घेतले तरी खोकला काही कमी होत नाही. अशा तक्रारी रुग्णांच्या वाढल्या आहेत. उपचार करणारे डॉक्टर रुग्णांवर विविध प्रकारच्या औषधांचा प्रयोग करूनही खोकला कमी होत नसल्याने डॉक्टरांना या खोकल्याच्या साथीने चक्रावून टाकले आहे.
डॉक्टरांनी खोकल्याच्या रुग्णांना भविष्यात शारिरीक मोठा धोका निर्माण होवू नये, इतर आजाराची लागन होवू नये म्हणुन “ब्रांकोडायलेटर व स्टीरॉईड’ या प्रभावी औषधांचा उपचार देत आहेत. जे पुर्वी दमा, अस्थमा अशा अति तीव्र खोकल्याच्या रुग्णांना दिले जात होते, अशी माहिती ज्येष्ठ हृदय रोग तज्ञ डॉ. गोवर्धन हुसळे यांनी दिली.
सध्याच्या वातावरणात झालेला बदलाने खोकला सर्दीने नागरीक त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी खोकल्याच्या उबाळ्या येवून दम लागतो. त्यातच खोकला रुग्णांना अस्वस्थ करीत आहेत. खोकला हा संसर्गजन्य आजार आहे. एकाला खोकला झाल्यानंतर त्याची लागण त्याच्या सहवासात येणाऱ्या व्यक्तीला होते. त्यामुळे या अति त्रास खोकल्याची लागन वाढत आहे. गर्दीच्या ठिकाणी व सामुदायीक ठिकाणातून याचा संसर्ग अधिक होत आहे.
तेव्हा नागरीकांनी अशा ठिकाणी काळजी घेणे आवश्यक आहे. खोकला झाल्यास कोमट पाणी पिणे, तळलेले तेलगट, मसालेदार पदार्थ खाऊ नये, त्वरीत संबंधित डॉक्टरांचा सल्ला घेवून योग्य तो उपचार घेतल्यास जीवीताला धोका कमी आहे. मात्र दुर्लक्ष केल्यास निमोनिया, दमा, अस्थमा असे आजार बळावण्याची शक्यता आहे.
सध्या मधुमेह, कर्करोग, एच आय व्ही, या आजाराच्या रुग्णांसह लहान मुलं वृध्द नागरीक यांच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने अशा साथीच्या आजाराची लागन त्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. एकाच्या संपर्कात दुसरा आला कि त्यालाही लागन होते. तेव्हा प्रत्येकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. माणसांची जीवन शैली बदलल्यामुळे व वातावरणातील वाढलेले प्रदुषण याचा परिणाम मानवी शरीरावर होत आहे. रोग प्रतिकार शक्ती कमी झाली आहे. शरिराला कसरती नसल्याने बळकटपणा कमी झाला आहे. असे मत बालरोग तज्ञ डॉ.अमोल अजमेरे यांनी व्यक्त केले.