पोटाची खळगी भरण्यासाठी फरफट : प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
डिंभे – एकेकाळी उजाड माळरान असलेला आंबेगाव तालुक्याच्या सर्व गावांमध्ये पाणी नेऊन गावांचा आर्थिक स्तर उंचावत तालुक्याचे नंदनवन करण्यात महत्त्वाचा वाटा असलेले बाबू गेनू जलशयासाठी म्हणजेच डिंभे धरण प्रल्पासाठी वडिलोपार्जित जमिनी देऊन तालुकाच्याच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या उन्नतीसाठी त्याग करणाऱ्या डिंभे धरणग्रस्तांची आजही आपल्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी फरपट सुरूच असून प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याने आम्हाला कोणी वाली आहे का? अशी आर्तहाक या डिंभेग्रस्तांनी दिली आहे.
आंबेगाव तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहिली असता डोंगरी आदिवासी पश्चिम पट्ट्यामध्ये 300 इंचापेक्षा जास्त पाऊस, तर नदीकाठची गावे वगळता खडकाळ जिरायती जमीन पाहायला मिळते. 1972 मध्ये डिंभे परिसरात धरण बांधण्याचे निश्चित करण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन होऊन धरण निर्मिती सुरू झाली आणि तब्बल 20 वर्षानंतर हे धरण पूर्णत्वास आले.
या धरणामुळे आंबेगाव, शिरूर, पारनेर तालुक्यांतील एकूण 46 गावांतील 14129.25 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले, त्यामुळे या तालुक्यातील गावांमधील अल्पभूधारक शेतकरी योग्य नियोजन करून जास्तीत जास्त उत्पादन मिळवू लागले, तसेच शेतीपूरक व्यवसायही सुरू झाले आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला.
एकीकडे डिंभे धरणामुळे तालुक्याचा आलेख उंचावला असला, तरी दुसरीकडे एकेकाळी आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या डिंभे धरणच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या भूमिपुत्रांची मात्र फरपट सुरू झाली असून आजही अनेक जण आपल्या कुटुंबाची पोटाची खळगी भरण्यासाठी पडेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत.
हेलपाटे मारूनही भूखंड नाहीच
एकूण 24 गावांतील 1254 बाधित खातेदारांकडून 36 खातेदार पुनर्वसनासाठी अपात्र ठरले आहेत, तर 64 खातेदारंकडून 65 टक्के रक्कम मुदतीत न भरल्याने हे खातेदार अपात्र ठरले आहेत, 1218 खातेदार पुनर्वसनास पात्र ठरले आसून, 228 भूमिहीन शेतमजुरांचा यात समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत बाधित असलेल्या खातेदारांचे आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव, कळंब, खडकी, अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, लाखणगाव, तसेच पारनेर तालुक्यातील जवळे, म्हशे, निघोज, कोहकडी या ठिकाणी प्रल्कपग्रस्तांचे भूखंड वाटप करण्यात आले होते. डिंभे धरण प्रकल्पामुळे आंबेगावसह नगर जिल्ह्यातीलाहा भाग बागायती झाला आणि पाण्यामुळे या लोकांचे जीवनमान उंचावले; पण धरण ग्रस्तांचे काय, ते अजूनही हेलपाटे मारून देखील भूखंड मिळाले नाही.
वस्तुस्थिती वेगळी
देशाच्या व समाजाच्या विकासासाठी जमीन जुमल्याचा त्याग करणाऱ्या भूमिपुत्रांची आजही परवड पाहायला मिळत आहे. 1290 शेतकऱ्यांचे 90 टक्के पुनर्वसन झाल्याचे शासकीय आकडेवारीनुसार दिसून येत आहे; परंतु वस्तुस्थिती वेगळीच असून, यापेक्षा जास्त खातेदारांचे पुनर्वसन झाले नसल्याचे दिसून येत आहे.
ही गावे पूर्णतः बाधित
डिंभे धरणामुळे आंबेगाव, कळबई, फुलवडे, कोलतावडे, मेघोली, वचपे, दिग्दद, पंचाळेबु, सावरली, कुशिरे, महाळुंगेतर्फे आंबेगाव, बोरघर, पाटण, कुशिरे बुद्रुक, पिंपरी, जांबोरी, फलोडे, आमडे, पेंधारवाडी, नानवडे, डिंभे बुद्रुक, पाचाळे बुद्रुक, आडिवरे.