देहूरोड – देहूरोड बाजारपेठ परिसरातील पथारीवाले व छोट्या विक्रेत्यांकडून प्रतिदिन पन्नास रुपये कर आकारून कॅंटोन्मेंट बोर्ड प्रशासन लूट करीत असल्याचा आरोप केला जात आहे. बोर्डाचे कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत नसल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने व्यापाऱ्यांना योग्य न्याय द्यावा, अशी मागणी भाजपचे सूर्यकांत सुर्वे यांनी निवेदनाद्वारे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरुप हरितवाल यांच्याकडे केली आहे.
देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील अबू शेठ मार्ग, उड्डाणपुलाखाली, भाजीमंडई परिसर तसेच मुख्य बाजारपेठेमध्ये पथारीवाले व छोटे विक्रेते रस्त्यांवरच व्यवसाय करत असतात. या विक्रेत्यांकडून कॅंटोन्मेंट बोर्ड पंधरा रुपये कर प्रतिदिन आकारत होते. कर वाढविण्यासंदर्भात बोर्डाच्या बैठकीत पन्नास रुपये 35 रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच नव्याने आकारण्यात येणाऱ्या करा संदर्भात (पस्तीस रुपये) बोर्डाच्या वेबसाईटवर पोस्टही टाकण्यात आली आहे. बोर्डाचे कर्मचारी पथारी वाल्यांकडून 50 रुपये प्रतिदिन आकारत असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत नागरिकांनी तशी तक्रारही केली आहे. पथारी वाल्यासह छोटे विक्रेते असे तीनशेहून अधिक आहेत. विक्रेते, व्यापाऱ्यांकडून कर वसूल करताना बोर्डाचे कर्मचारी “प्रामाणिकपणा’ काम करीत नाहीत. त्यामुळे बोर्ड प्रशासनाने अचानक बाजारात भेट देत पाहणी करावी. त्यानंतर योग्य तो निर्णय घेऊन व्यापाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.