शहरातील पोलीस कर्मचारी, अधिकारी सुस्त; चोरटे मस्त
पिंपरी – एकाच रात्रीत चोरट्यांनी रहाटणी आणि म्हाळुंगे येथे एटीएम फोडले. या दोन्ही गुन्ह्यातील चोरट्यांची गुन्हा करण्याची पद्धत वेगळी असली तरी चोरट्यांनी पोलिसांना एकप्रकारे आव्हानच दिले आहे. मागील दोन वर्षांत चोरट्यांनी तब्बल 18 एटीएम फोडल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. वाढत्या एटीएम फोडीच्या घटना पाहता “शहरात पोलीस सुस्त, चोरटे मस्त’ असे वातावरण निर्माण झाले आहे.
या गुन्ह्यांचा तपास लावण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी “एसआयटी’ची स्थापना केली. चिखली येथे चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयन केला. मात्र, चोरटे नवखे व जवळच राहत असल्याने पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. ही घटना वगळता इतर कोणताही महत्त्वाचा तपास एसआयटीने लावलेला नाही. दिल्ली पोलिसांनी एटीएम फोडणाऱ्या टोळीला पकडले. या टोळीने चिखली येथे एटीएम फोडल्याची कबुली दिली असल्याचे एसआयटीचे म्हणणे आहे. मात्र, इतर एटीएम फोडण्याच्या घटनेतील आरोपींना शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.
कुठे गेली गस्त आणि नाकाबंदी
एटीएम फोडण्याच्या घटना रोखण्यासाठी शहरातील सात ठिकाणी एन्ट्री पॉइंटवर नाकाबंदी करण्याची घोषणा पोलीस आयुक्तांनी केली होती. तसेच रात्रीच्या वेळी एमटीएमवर देखरेख करण्यासाठी स्थानिक पोलिसांसोबत गुन्हे शाखेचे कर्मचारी दिले होते. असे असतानाही शहरात सराफांची दुकाने व एटीएम फोडण्याच्या घटना सुरूच असल्याने कुठे गेली नाकाबंदी आणि कुठे गेले गस्तीपथक, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
एटीएमच्या सुरक्षिततेकडे बॅंकांचे दुर्लक्ष
शहरात सतत एटीएम फोडण्याच्या घटना घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्व बॅंक अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत एटीएमच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. एवढेच नव्हे तर पोलिसांनी बॅंक अधिकाऱ्यांना लेखी पत्रही दिले. मात्र, बॅंकांचा निष्काळजीपणा सुरू आहे. बुधवारी रहाटणी येथे ज्या बॅंकेचे एटीएम फोडले त्या बॅंकेलाही पोलिसांनी लेखी पत्र दिले होते. तरीदेखील बॅंकेने पोलिसांच्या सूचनेला केराची टोपली दाखविली.
आयुक्तांची घोषणा हवेतच
एटीएमच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणाऱ्या बॅंकांवर गुन्हे दाखल करणार असल्याची घोषणा पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी केली. त्यानंतरही एटीएम फोडीच्या तीन घटना झाल्या. मात्र, पोलिसांनी एकाही बॅंकेवर गुन्हा दाखल केलेला नाही. याउलट रात्री गस्त व्यवस्थित केली नाही म्हणून वाकड पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.