29 फेब्रुवारीपासून पाच दिवसांचा आठवडा
मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. येत्या 29 फेब्रुवारीपासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवारी सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी असणार आहे. सरकारी कर्मचारी आणि अधिकारी सध्या दिवसाला आठ तास काम करतात. पाच दिवसांचा आठवडा झाल्यावर कर्मचाऱ्यांना दररोज 45 मिनिटे जास्त काम करावे लागणार असल्याचे या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांसाठी सकाळी पावणे दहा ते संध्याकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत शिफ्ट असणार आहे. पाच दिवसांच्या आठवडा झाल्याने सरकारी कर्मचारी जरी खूश झाले असले तरी, आपली कामे वेळेत होणार का? असा प्रश्न जनतेला नक्कीच पडला असणार आहे. काही वर्षांपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेची पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी अखेर यामुळे पूर्ण झाली आहे. दरम्यान, केंद्राच्या धर्तीवर राज्यात पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या निर्णयाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विरोध असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला आहे.
पाच दिवसांचा आठवडा केल्यास सरकारी कार्यालयाच्या वेळांमध्ये वाढ करावी लागणार आहे. 10 वाजता सुरू होणारी कार्यालये सकाळी 9 वाजता सुरू करावी लागणार आहेत. सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत कामकाजाची वेळ वाढवावी लागणार आहे. सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी यासंदर्भात त्यांच्याकडे निवेदने दिली होती. पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी या संघटनांनी केली होती.
अखेर बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं. सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनियम किंवा औद्योगिक विवाद लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात अशा कार्यालयाना व शासकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार यांना पाच दिवसाचा आठवडा लागू नाही.