वंदना बर्वे
2530 मराठी नेते तंबू ठोकून होते
नवी दिल्ली – दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमुळे महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा पानीपत झाले आहे. पानीपतच्या युध्दात लाखो मराठ्यांनी जीवाची बाजी लावली होती. यानंतर आता दिल्लीच्या निवडणुकीत मराठा सरदारांना केविलवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात दिल्लीचा पराभव हा काळ्या अक्षरात लिहिला जाईल.
गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत तैनात केलेल्या फौजफाट्यामुळे या निवडणुकीला युध्दासारखे स्वरूप प्राप्त झाले होते. भाजपचे लोकसभा आणि राज्यसभेतील 350 खासदार, केंद्रीय मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री माजी खासदार, आमदार असा फौजफाटा तैनात केला होता. ही सगळी मंडळी दहा दिवसापासून दिल्लीत तंबू गाठून होती. आम आदमी पक्षाच्या झाडुने भाजपचा सुपडा साफ झाला.
मात्र, या निवडणुकीमुळे महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासाच्या पानात पानीपतसारख्या आणखी एका पराभवाची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपचे 2530 माजी मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी दिल्लीत ठाण मांडून बसले होते.
गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांना दिल्लीच्या निवडणुकीत तैनात केले होते. निवडणुकीचे प्रभारी वने व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी गृह राज्यमंत्री हसंराज अहिर, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, प्रवीण दरेकर, संजय कुटे, सुरजित सिंह ठाकूर असे अनेक नेते मैदानात होते.
महत्वाचे म्हणजे, एखाद्या निवडणुकीत एवढ्या संख्येत मराठी सरदार तैनात झाल्याची ही पहिलीच वेळ होय. यापूर्वी, पानीपतच्या युध्दात लाखो मराठी सरदारांना वीरमरण आले होते. आता दिल्लीच्या निवडणुकीत सर्वांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे, दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राला पानीपतसारख्या दुसऱ्या पराभवाचे तोंड बघावे लागले आहे, असे म्हणायला हरकत नाही.