वाहतूक कोंडीत भर : प्रशासनाला ना सोयर, ना सूतक
पुणे -“स्मार्ट सिटी’ होत असणाऱ्या शहरातील कामांचा फायदा नागरिकांना होणार आहे. परंतु, या कामांमुळे अनेकदा वाहतूक कोंडीमध्ये भर पडत असून, नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
शहरातील अनेक ठिकाणी विकासकामे होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने रस्त्याचे रूंदीकरण करणे, पदपथांचे सुशोभीकरण करणे, सायकल ट्रॅक उभारणे, रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करणे आदी कामे हाती घेण्यात आली आहे. नागरिकांच्या हितासाठी सुरू असणाऱ्या या कामांचा फटका नागरिकांनाच बसत आहे.
या कामांसाठी खोदलेल्या रस्त्यांमुळे “अपुऱ्या’ रस्ते “अरूंद’ होत आहेत. यामुळे वाहनांच्या रहदारीसाठी पुरेसा रस्ता उपलब्ध होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी देखील होत आहे. या वाहतूक कोंडीमध्ये ढिसाळ नियोजन आणि वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती भर घालत आहे. याचबरोबरीने रस्त्याचे खोदकाम करताना सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना न केल्याने अपघातांचा धोका संभावतो. पर्यायाने नागरिकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे.
बिबवेवाडीत अपघाताचा धोका
बिबवेवाडी परिसरात सुरू असणाऱ्या कामामुळे स्थानिकांमध्ये समाधानाच्या बरोबरीने नाराजीचे देखील वातावरण आहे. या रस्त्यावर सुरू असणाऱ्या कॉंक्रीटीकरणाच्या कामामुळे दुभाजकाच्या दोन्ही बाजूंचा अर्धा रस्ता व्यापला असल्याने, वाहनांच्या रहदारीसाठी कमी जागा शिल्लक राहत आहे. यासह काम करताना योग्य पद्धतीने “बॅरिकेडिंग’ न केल्याने अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. रस्त्याच्या या स्थितीमुळे या परिसरातील वाहतूक कोंडीमध्ये भर पडत आहे.
वाहतूक शाखेचे कर्मचारी नसणे आणि बेभरवशाची सिग्नल यंत्रणा कोंडीमध्ये भर घालत आहे. रस्त्यांवर असणाऱ्या खडी आणि धोकादायक ड्रेनेजच्या जाळ्यांमुळे वाहन सावधपणे चालवावे लागते. मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या खड्ड्युांमुळे पाठदुखीमध्ये देखील भर पडत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. वाहतूक कोंडी, खड्डे, रस्त्यावर पडलेली खडी आणि धूळीपासून संरक्षण करत इच्छितस्थळी पोहोचण्याची कसरत वाहनचालक आणि पादचाऱ्यांना करावी लागत आहे.