सातारा – मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच जिल्ह्यात आले होते. महाबळेश्वरमध्ये विश्रांतीसाठी त्यांनी तीन दिवसांचा मुक्काम केला. त्यांच्या सुरक्षेसाठी महाबळेश्वरच्या राजभवनात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हा मुक्काम संपल्यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हा पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकून त्यांच्यासोबत फोटोसेशन केले. त्यामुळे तीन दिवसांच्या बंदोबस्ताचा शिणवटा दूर झाल्याची भावना पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीनंतर दोन महिन्यांच्या प्रचंड घडामोडीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील अनेक भागांचा दौरा केला. त्यामुळे त्यांची प्रचंड धावपळ झाली. त्यामुळे ते सहकुटुंब विश्रांतीसाठी महाबळेश्वरला तीन दिवसांच्या मुक्कामी आले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते प्रथमच जिल्ह्यात आल्याने शिवसैनिक व नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
दरम्यानच्या काळात शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या मुलीच्या विवाहासाठी जवळपास अख्खे राज्य मंत्रिमंडळ व राज्यातील दिग्गज नेते महाबळेश्वरात आले होते. त्यामुळे सातारा पोलिसांवर बंदोबस्ताचा प्रचंड ताण पडला. मात्र, मुक्काम संपताच मुख्यमंत्र्याची पोलिसांना आश्चर्याचा धक्का दिला. मुंबईला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी सोमवारी राजभवनाच्या बाहेर सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लॉनमध्ये येण्याचा निरोप धाडला.
मुख्यमंत्र्यांचे बोलावणे आल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये “काय घडले’ असावे, अशी कुजबूज सुरू झाली. इतक्यात सर्व कर्मचाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांना फोटो काढायचा असल्याचा निरोप आला आणि पोलिसांचा जीव भांड्यात पडला. पोलिसांबरोबर फोटोसेशन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानत निरोप घेतला. मुख्यमंत्र्यांच्या या सौजन्यशील वृत्तीमुळे तीन दिवसांच्या बंदोबस्ताचा शिणवटा दूर झाल्याची भावना पोलिसांनी व्यक्त केली. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली.
पोलिसांमुळे आम्ही सुरक्षित
राज्यातील व देशातील पोलिसांमुळे नागरिक सुरक्षित असतात. त्यामुळे मला पोलिसांचा कायम अभिमान वाटतो, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह सर्वांचे कौतुक केले.
आमच्यासाठी सुखद धक्का
आजवर आम्ही मुख्यमंत्र्यांना लांबून पाहायचो. त्यांची सुरक्षा व्यवस्था पाहणे, इतकेच आम्हाला माहिती होते. पोलीस दलात शिस्तीला महत्त्व असल्याने आमच्यावर अनेक निर्बंध येतात; परंतु मुख्यमंत्र्यांनी आम्हा सर्वांना बोलवून आस्थेवाईकपणे चौकशी केली. आमच्यासोबत फोटोसेशन केले, हा आमच्यासाठी सुखद धक्का होता, अशी भावना पोलिसांनी व्यक्त केली.